ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : ताडकळस व परिसरातील शेतक-यांचे नोव्हेंबर महिन्यात सोसाट्याच्या वादळीवा-यासह मुसळधार पडलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सहा महिने होऊनही बाधीत पिकाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे.
अवकाळीने नुकसान झालेल्या पिकासाठी शासनाने पूर्णा तालुक्यातील शेतक-यांना वाटप करावयाच्या अनुदानापोटी २६ कोटी ९३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी तहसीलच्या प्रशासकिय अधिकारी आणि तलाठ्यांनी गावागावात शेतकऱ्यांच्या याद्या दिल्या. यादीवरील नावापुढे आधार, बँक खाते, मोबाईल क्रमांक नमूद करुन याद्या महसूलकडे परत देण्यात आल्या. याद्या तहसील स्तरावरुन शासनाच्या सबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. त्यानंतर शासनाच्या शेतक-यांच्या खात्यात मार्चअखेर थेट अनुदान रक्कम वर्ग होईल असे सांगण्यात आले. परंतु एप्रिल महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षाच आहे.