जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : टाकळखोपा शिवारात सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावली आहे. ही घटना मंगळवारी घडली. यामध्ये 3 लाख 32 हजार रुपयांचे नुकसान झाले असून 3 संशयित आरोपीविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील श्रीरामवाडी येथील शेतकरी विठ्ठल ठकूजी श्रीरामे यांची टाकळखोपा शिवारात गट क्रमांक 44 मध्ये शेती आहे. विठ्ठल श्रीरामे यांनी व त्यांचा चुलत भाऊ नारायण कोंडीबा श्रीरामे यांनी टाकळखोपा शिवारातील गट क्रमांक ३८ मधील गावठाण जमीन घेतली आहे. त्यामुळे त्यांचे शेता शेजारी उत्तम भाऊराव पोले हे सदर जमीन तुम्ही का केली म्हणून नेहमी त्रास देतात. ती जमीन आम्हाला करायची होती म्हणून नेहमी काहीतरी कुरापती करत असतात.
श्रीरामे यांनी केलेल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीनची कापणी करून त्यांनी शेतात जमा करून ठेवली होती. श्रीरामे यांना मंगळवारी सकाळी 3 वाजेच्या सुमारास शेतात जाळ व धूर निघत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी चुलत भाऊ नारायण श्रीरामे यांना सोबत घेत शेतात जाऊन पाहिले असता, त्यांना सोयाबीनची गंजी जळताना दिसली. त्यांनी आरडाओरड केला असता ग्रामस्थ धावून आले. मात्र तोपर्यंत सोयाबीनची गंजी जळून खात झाली होती. तसेच गंजीवर ठेवलेल्या स्पिंकलरच्या छड्या देखील जळाल्या. यामध्ये त्यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे सोयाबीन व 32 हजार रुपयांच्या छड्या असे एकूण तीन लाख 32 हजार रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी विठ्ठल ठकूजी श्रीरामे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी उत्तम भाऊराव पोले, भाऊराव उत्तमराव पोले, लखन उत्तमराव पोले यांच्याविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.