

नरेंद्र येरावार
उमरी : व्हिपीके उद्योग समूहातील व्हिपीके अँग्रो प्रयागनगर सिंधी, डॉ. शंकरराव चव्हाण जागरी अँग्रो प्रोडक्ट कुसुमनगर वाघलवाडा आणि एमव्हीके अँग्रो प्रा.लि. कुसूमनगर वाघलवाडा या तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची व आर्थिक दृष्ट्या सुबकता देणारी भाववाढ योजना उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी जाहीर केली आहे. शिवाय मार्च महिन्यात गाळपासाठी आलेल्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाला तब्बल तीन हजार रुपये प्रति टन भाव मिळणार आहे.
माहे जानेवारीपासून गाळपासाठी येणाऱ्या उसाला दर पंधरा दिवसांनी पन्नास रुपये भाव वाढीची योजना मागील चार वर्षांपासून उद्योगसमूहामार्फत राबवण्यात येत आहे. आता सुरू असलेल्या गाळप हंगामातदेखील याच पद्धतीने योजना राबवण्यात आली असून मार्च महिन्याच्या 01 ते 15 तारखेसाठी 50/- रु. भाव वाढ अपेक्षित होती. परंतु ती वाढवून 100/- रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात गाळपासाठी येणाऱ्या सभासदांच्या उसाला प्रतिटन तीन हजार रुपये व बिगर सभासदाच्या उसाला 2800 रुपये भाव असेल.
याची नोंद घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी ऊस तोडणीसाठी घाई न करता व इतर कारखान्यास ऊस न देता आपला ऊस पाणी देऊन राखून ठेवावा व आपल्या हक्काच्या कारखान्यास ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे. या अभूतपूर्व भाव वाढ योजनेचा लाभ घ्यावा. ज्या शेतकऱ्यांनी सभासद ठेव रक्कम भरली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली सभासद ठेव भरून भरून सभासद नोंद करावी.
तसेच आता सभासद ठेव रक्कम भरून सभासद नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचा ऊस या हंगामात म्हणजेच 2025-026 मध्ये सुरुवातीला गाळपासाठी आलेला असला तरी त्यांना प्रतिटन 200/- रुपये भाववाढ दीपावली सणाला मिळणार आहे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जास्तीतजास्त ऊस लागवड करण्यासाठी उद्योग समूहाच्या वतीने गावोगावी जाऊन माहिती देण्याचे कार्य सुरू केले आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला अधिकचा भाव मिळून ऊसउत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल. हे मात्र विशेष.