

Two oxen killed by lightning strike; Umri Taluka witnesses rain accompanied by stormy winds
उमरी : पुढारी वृत्तसेवा
विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने आज (रविवार) सायंकाळी उमरी तालुक्यातील काही भागात हजेरी लावली. यावेळी वीज पडून हुंडा तांडा येथील दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रविवारी सायंकाळी बहुतांश गावात वादळी वारे वाहू लागले. काही भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यातच उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथील पांडुरंग संगू राठोड हा शेतकरी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली दोन बैल बांधून घरी आला होता. तेवढ्यात वादळी वारे आणि विजेचा कडकडाट सुरू झाला.
यावेळी लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दोन्ही बैलांवर वीज पडली. यामध्ये दुर्देवाने दोन्ही बैल ठार झाले. त्यांची किंमत अंदाजे एक लाख ६० हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी, महसूल, कृषी विभागाला याची माहिती देण्यात आली. पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास राठोड यांनी केली आहे.