

Sugarcane crushing likely to exceed one crore tonnes
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : २०२५-२६ या नवीन गाळप हंगामात नांदेड विभागात ३० कारखान्यांनी गाळपाचा परवाना मागितला आहे. गतवर्षी २९ कारखान्यांनी गाळप केले. यावेळी पानगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पन्नगेश्वर कारखाना नव्याने गाळप सुरू करतो आहे. दरम्यान, उसाची उपलब्धता पाहता यंदा १ कोटी मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप होईल व एक कोटीपेक्षा अधिक क्विंटल साखर निर्मिती होईल, असा अंदाज आहे.
केंद्र सरकारने यावर्षी १०.२५ टक्के उताऱ्यासाठी ३५५ रुपये एफ.आर.पी. जाहीर केली आहे. ऑगस्टपासून जोर पकडलेला पाऊस अद्याप परतला असे म्हणता येणार नाही. संततधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे अन्य सर्व पिके पूर्णपणे बुडाली असली तरी हाच पाऊस उसाला उपकारक ठरल्याचे मानले जाते.
त्यामुळे यंदा साखर उतारा चांगला होईल, अशी शक्यता आहे. परंतु त्यातूनच मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पूरग्रस्तांना मदतीसाठी ठराविक रक्कम कापून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावरून आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, गतवर्षी नांदेड विभागातील नांदेडसह लातूर, परभणी व हिंगोली अशा चार जिल्ह्यांत मिळून २९ कारखान्यांनी ९८ लाख ६९ हजार १७९ मेट्रिक टन उसाचे गाळप करताना ९५ लाख ३६ हजार ६९२ क्विंटल साखरेची निर्मिती केली होती.
सर्वाधिक लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ३२ लाख ११ हजार ९३२ क्विंटल साखर निर्मिती ९.४५ टक्के उताऱ्याच्या माध्यमातून झाली होती. २९ पैकी १९ खासगी तर १० सहकारी साखर कारखान्यांनी वरील गाळप केले. मार्च २०२५ अखेरपर्यंत गाळप पूर्ण झाले. दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत गाळप परवान्यासाठी नोंदणी करणे क्रमप्राप्त असते. त्यानुसार यावर्षी ३० साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी नोंदणी केली आहे. त्यानुसार गतवर्षीचे वरील २९ कारखाने यंदा पुन्हा गाळपासाठी सज्ज आहेत.
त्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पन्नगेश्वर कारखान्याची भर पडली आहे. त्यामुळे २० खासगी व १० सहकारी साखर कारखाने यावर्षी गाळप सुरू करतील. पैकी परभणी जिल्ह्यातील सात (सर्व खाजगी) कारखान्यांनी गाळपाची तयारी दर्शवली. हिंगोलीमध्ये पाच (पैकी २ खासगी), नांदेडमध्ये ६ (५) आणि लातूर जिल्ह्यातील १३ (७) कारखाने गाळप करणार आहेत. नांदेड विभागात यंदा ३ लाख २७ हजार ७९३ हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. तर कृषी विभागाच्या अंदाजानुसार १ लाख ३० हजार ७९२ हेक्टरवर ऊस आहे. या दोन विभागांच्या आपापल्या अंदाच्या संयुक्त सरासरीनुसार १ लाख १ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. अर्थात नांदेड विभागातील चार जिल्ह्यांत मिळून १ कोटी ३७लाख ६३ हजार १७५ मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला असून ढोबळ मानाने यंदा १ कोटी मेट्रिक टनपेक्षा अधिक उसाचे गाळप होईल तसेच साखर निर्मितीसुद्धा १ कोटी क्विंटलचा टप्पा पार करेल, अशी शक्यता आहे.
वाढीव एफआरपीचा फायदा शून्य २०२४-२५ च्या गाळप हंगामात उसाला प्रतिक्विंटल १०.२५ टक्के उताऱ्यासाठी ३४० रुपये एफ.आर.पी. देण्यात आला होता. यंदा त्यात १५ रुपयांनी वाढ करण्यात आली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १० रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर ५ रुपये पूरग्रस्तांना मदत म्हणून कापून घेण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे एका हाताने एफआरपी वाढवून दिली व दुसऱ्या हाताने काढून घेतली, अशी नाराजी व्यक्त होत आहे.