

किनवट : राज्य परिवहन महामंडळातील प्रलंबित वेतनवाढ, आर्थिक लाभ आणि इतर मागण्यांसाठी एस.टी. कामगारांच्या संयुक्त कृती समितीने राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार किनवट आगारातील कामगार १४ ऑक्टोबरपासून आगाराच्या प्रवेशद्वारासमोर शांततेच्या मार्गाने धरणेधरणे आंदोलन करणार आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समिती, किनवट आगार शाखेने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्राद्वारे कळविले आहे की, राज्यभरातील सर्व आगारांमधील कामगार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकत्र येऊन शासनाला इशारा देत आहेत. या धरणे आंदोलनासाठी शासन व प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली असून, आंदोलन पूर्णतः शांततापूर्ण स्वरूपात होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
धरणे आंदोलनात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, कास्ट्राईब रा.प. परिवहन संघटना आणि बहुजन रा.प. अधिकारी-कर्मचारी संघटना या चार प्रमुख संघटना सहभागी होणार आहेत.
संयुक्त कृती समितीने मागण्यांची पूर्तता लांबणीवर गेल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, शासनाने तत्काळ तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराही दिला आहे.
राज्यभरात सुमारे २५० पेक्षा अधिक आगारांमध्ये हे आंदोलन होण्याची शक्यता आहे. वेतनवाढ, सेवा स्थैर्य, आणि सेवानिवृत्ती वेतनाशी संबंधित मागण्या या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. मागील काही महिन्यांपासून या प्रश्नांवर चर्चा सुरू असली तरी ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे सूत्राकडून समजले.