

किनवट : राज्यातील बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला जोर चढत असताना, शनिवारी (दि.11) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या किनवट तालुक्यातील दौऱ्यादरम्यान आंदोलनाची ठिणगी उडाली. सारखणी येथील तुळजाभवानी मंदिराजवळ चव्हाण यांच्या ताफ्याला बंजारा समाजातील बांधवांनी अडथळा आणला, घोषणाबाजी केली आणि लेखी निवेदन देत आपली मागणी मांडली.
निवेदनकर्त्यांनी “बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित लागू करावे” अशी मागणी केली. तसेच “आपण या प्रश्नाला समर्थन का देत नाही?” असा थेट सवाल उपस्थित करून “आपली या संदर्भातील भूमिका स्पष्ट करा” अशी विनंती केली. त्यांनी पुढे नमूद केले की, त्यांच्या कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या विजयात बंजारा समाजाचा मोठा वाटा होता, त्यामुळे या बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर मौन बाळगणे योग्य नाही. या वेळी मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते.
बंजारा नेत्यांनी सांगितले की, राज्यभर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत सुमारे 50 मोर्चे काढण्यात आले असूनही, सरकारकडून यावर कोणताही सकारात्मक विचार झालेला नाही. त्यावर उत्तर देताना अशोकराव चव्हाण म्हणाले, “हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. कोणत्याही समाजाची हानी न होता आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तोडगा काढणे गरजेचे आहे. सध्या मराठा व ओबीसी समाजात आरक्षणावरून मतभेद आहेत, आणि तुमच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवरून आदिवासी समाजाचा विरोध होतांना दिसतोय. परवाच नांदेडला आदिवासी समाजाचा मोठा मोर्चा निघाला. त्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण न करता, परस्पर सामंजस्याने मार्ग काढणे आवश्यक आहे. मी तुमचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सादर करून कुठल्याही समाजाचे अहित न होता योग्य तोडगा काढण्यासाठी चर्चा करेन,” असे ते म्हणाल्याचे सूत्रांकडून समजले.
घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांनी तत्परता दाखविल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आंदोलन शांततेत पार पडले. प्रारंभी आंदोलनकर्त्यांनी “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा” आणि ‘जय सेवालाल’ अशा घोषणा दिल्या.
राज्यातील विविध भागांत गेल्या काही आठवड्यांपासून बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे, धरणे आणि आंदोलनांचे सत्र सुरू आहे. सारखणी येथील ही घटना त्या आंदोलन साखळीतील एक महत्त्वाची नोंद ठरली आहे.