

नरेंद्र येरावार
उमरी : उमरी शहर व तालुक्यातील 302 नवीन निराधार यांचे मानधन जवळपास सहा महिन्यापासून रखडले असून आजपर्यंत त्यांना आर्थिक मदत न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरीत आहे.
फेब्रुवारी महिन्यात संजय गांधी निराधार समितीची बैठक घेऊन यात पात्र 302 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. मंजूर प्रस्ताव झाल्यापासून आजपर्यंत शासनाच्या साईड बंदच्या कारणास्तव जवळपास सहा महिने लोटत असताना अद्यापपर्यंत या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात शासनाची आर्थिक मदत मिळालीच नाही. ज्यामुळे शहर व तालुक्यातील 302 लाभार्थ्यांना आर्थिक मदत न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने अपंग, विधवा, वयस्कर लाभार्थ्यांसाठी मदत म्हणून निराधार योजना अंमलात आणली. याचा उद्देश निराधार लोकांना आधार देणे हे आहे. पण शासनाकडूनच तब्बल सहा सहा महिने त्यांना मानधन मिळले नाही. शासनाच्याच विविध कारणामुळे लाभार्थी वंचित राहत आहेत. होत असलेला विलंब प्रकाराकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना निराधारंचे मानधन लवकर चालू करून द्यावे अशी मागणी होत आहे.
या संदर्भात निराधार योजनेचे अध्यक्ष डाॅ विक्रम देशमुख तळेगावकर म्हणाले, मंत्रालय स्तरावरून सॉफ्ट वेअर अपडेट करण्याचे कामं चालु होते. मंत्रालय स्तरावर हे कामं तात्काळ पूर्ण करण्यात यावे म्हणून आमदार राजेश पवार यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आहे. मंत्रालय व जिल्हा पातळीवर हे काम पूर्ण होऊन दिनांक 1 जुलै रोजी सॉफ्टवेअर अपडेट झाले आणि 1 जुलैपासून पहिल्या हप्त्याचे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. उर्वरित या आठवड्यात पूर्ण मानधन जमा होईल. काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.