

Records of the Pradhan Mantri Awas Yojana are missing in Mahur
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : माहूर नगरपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) प्रकरणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप झाले असतानाच, या योजनेशी संबंधित महत्त्वाची अभिलेखेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना पाठविलेल्या पत्रामुळे उघडकीस आला आहे. इतका गंभीर प्रकार घडूनही नगर प्रशासनाकडून अद्यापपर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर व कर्तव्यावर अनेक प्रश्न उभे झाले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता, लाभार्थ्यांच्या निधीचा अपहार व बोगस प्रक्रिया झाल्याच्या आरोपांमुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद तूपदाळे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सोडविण्याच्या अनुषंगाने माहूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना पत्र सादर केले आहे.
त्या पत्रात त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंधित लेखासंचिका, देयकांचा तपशील, मोजमाप पुस्तिका व इतर आवश्यक कागदपत्रे सध्या नगरपंचायतीच्या लेखा विभागाकडे पूर्णतः उपलब्ध नसल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेली असताना, संबंधित अभिलेख अचानक गायब होणे, हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
शासनाच्या महत्त्वाच्या योजनेची कागदपत्रे उपलब्ध नसणे म्हणजे केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच प्रदीर्घ कालावधी उलटून सुद्धा त्या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल न केल्याने नगर प्रशासन आपल्या कर्तव्याप्रती प्रतारणा करीत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
नियमांनुसार शासकीय अभिलेख हरविल्यास, गहाळ झाल्यास व चोरीला गेल्यास तत्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात किमान आज तरी तसे झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच संशयाचे ढग जमा झाले आहेत.
प्रशासन काय भूमिका घेणार?
या प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीने जोर धरला आहे. सदर प्रकरणी जिल्हा प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे.