

No justification whatsoever for 'those' slogans: MP Ravindra Chavan
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीचे समर्थन करता येणार नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दिले आहे.
झारखंड येथील एका सभेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले पुतळा, आयटीआय जवळ, खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सनातन धर्माच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या आक्षेपार्ह घोषणाबाजीमुळे सनातन धर्म संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी समाजमाध्यमांवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या घोषणांमुळे हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्याने अनेक संघटनांनी काँग्रेसने जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सनातन धर्म संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी रविवारी समाजमाध्यमावर संदेश जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, "नांदेड येथे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी अनावधानाने एका विशिष्ट समाजाविरुद्ध केलेल्या घोषणाबाजीचे आपण समर्थन करणार नाही. अशा घोषणा चुकीच्या असून, त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण निश्चितच माफी मागतो. मात्र, धर्माच्या आडून राजकारण करणाऱ्या लोकांचा त्यावेळी निषेध करण्यात आला," असेही त्यांनी स्पष्ट केले.
"स्व. बळवंतराव चव्हाण आणि स्व. वसंतराव चव्हाण यांच्या 'सर्वधर्मसमभाव' या नीतीनुसारच आमचे राजकारण सुरू आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही अनेकदा मेळावे घेतले आहेत आणि आजही घेत आहोत. मात्र, धर्माच्या आडून राजकारण करणाऱ्यांना यापुढेही आम्ही प्रश्न विचारत राहू," असे खा. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
माफी मागितल्याने या विषयावर पडदा
खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी पक्षाचे प्रमुख म्हणून माफी मागितल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त घोषणाबाजी च्या विषयाला आता पूर्णविराम मिळेल अशी शक्यता वरती जात आहे.