

Nanded MIDC Anti Encroachment
नवीन नांदेड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) सिडकोलगतच्या औद्योगिक वसाहतीत रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांविरोधात तीन दिवसीय विशेष मोहीम हाती घेतली आहे. १२ ते १४ जूनदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत पानटपऱ्या, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिक कारणांसाठी उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात येत आहेत.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसरातील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.
कारवाईवेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठले, उपरचनाकार चव्हाण, कार्यकारी अभियंता जावेद, क्षेत्रीय व्यवस्थापक गजानन कपाळे, सुरेखा फड, श्रीकांत तमखाने, संदीप देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान काही अतिक्रमणधारकांनी आपला व्यवसाय हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असल्याचे सांगत मुदतवाढ देण्याची मागणी केली. मात्र, संबंधितांना सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच नोटिसा देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे नियोजित कारवाई कायम ठेवण्यात आली.
दरम्यान, उस्माननगर रोड परिसरातील काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाची मोहीम सुरू होण्यापूर्वीच स्वतःहून पानटपऱ्या, हॉटेल्स व इतर अनधिकृत बांधकामे हटवून सहकार्य केले.
नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, भालेराव तसेच महिला पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.
या तीन दिवसीय मोहिमेमुळे एमआयडीसीतील मुख्य व अंतर्गत रस्ते अतिक्रमणमुक्त होण्यास मदत होणार असून, भूखंडधारक तसेच व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एमआयडीसी परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई स्वागतार्ह असली, तरी भविष्यात पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अनेकदा अतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसांतच रस्त्यालगत पुन्हा पानटपऱ्या, हॉटेल्स, लघुव्यवसाय आणि अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ मोहीम राबवून न थांबता प्रशासनाने नियमित पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
नवीन नांदेड : सिडको येथील गुरुवार बाजार मुख्य मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने गुरुवारी कारवाई करत रस्ता मोकळा केला. रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, स्टॉल्स व इतर अडथळे हटविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या या कारवाईनंतर मुख्य मार्गावरील वाहतुकीचा प्रवाह सुरळीत झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नियमित निरीक्षण व कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.