

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड-वाघाळा शहर मनपाच्या मागील काळातील सार्वत्रिक निवडणुकांत सक्रिय राहिलेले नांदेडमधील काही नेते सध्या सुरू असलेल्या रणधुमाळीमध्ये अलिप्त असल्याचे समोर आले. यानिमित्ताने माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची पन्नाशी झाल्याचेही दिसून आले.
मनपा निवडणुकीत भाजपा नेते खा.अशोक चव्हाण दिवस-रात्र प्रचारामध्ये गुंतलेले असताना राजकारणात त्यांना ज्येष्ठ असलेल्या सूर्यकांता पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम तसेच डॉ.माधवराव किन्हाळकर हे नेते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मित्रपक्षांच्या प्रचारामध्ये कोठेही दिसले नाहीत.
वरील तिन्ही नेते अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक म्हणून दीर्घकाळओळखले गेले. हे तिघेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये आहेत. या पक्षाने मनपाच्या काही जागांवर उमेदवार उभे केले असले, तरी आतापर्यंतच्या रणधुमाळीत या पक्षाचे आणि उमेदवारांचे नाव चर्चेतही आले नाही.
सूर्यकांता पाटील यांची राजकीय कारकीर्द नगरसेवकपदापासून 1970 नंतर तर कदम यांची 1972 साली जि.प.सदस्यपदापासून सुरू झाली. या नेत्यांचे वास्तव्य नांदेडमध्येच. त्यांनी दीर्घकाळ आपला प्रभाव राखला. पण दोघांनीही वयाची पंचाहत्तरी पार केली तर किन्हाळकरांनी पासष्टी ओलांडली आहे. मनपाच्या मागील निवडणुकांत हे नेते आपल्या उमेदवारांसाठी प्रभागांमध्ये फिरल्याचे, लोकांमध्ये मिसळल्याचे बघायला मिळाले; पण आता त्यांनी प्रचार कार्यातून घेतलेली ‘एक्झिट’ ठळकपणे जाणवली.
नांदेडमध्ये शरद पवारांच्या पक्षाच्या तुलनेत अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’चा बराच विस्तार झाला आहे. या पक्षाने भाजपा आणि खा.चव्हाण यांना आव्हान दिले असले, तरी या पक्षाच्या कारभाऱ्यांनी मनपा निवडणुकीत थोरल्या पवार यांच्या पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला नाही. वरील तीन नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी पवारांचे नांदेडमधील शिलेदार होते. 2023 साली राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर कमलकिशोर कदम यांनी थोरल्या पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्षातील फुटीनंतर सूर्यकांता पाटील व डॉ.किन्हाळकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांकडे धाव घेतली. ते सध्या याच पक्षामध्ये आहेत.
भाजपात आता नवनेतृत्वाचा प्रभाव वाढल्यामुळे या पक्षातील अनेक माजी पदाधिकारी बाजूला पडले. तेही प्रचारामध्ये आघाडीवर दिसले नाहीत. एका माजी आमदारासह पक्षाचे जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारही अलिप्त असल्याचे दिसले.
1989 पासून जनता दलाशी जोडले गेलेले डॉ.व्यंकटेश काब्देे हेही वयोपरत्वे थकल्यामुळे मनपाच्या प्रचारात कोठेही दिसत नाहीत. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेले पी.डी.जोशी पाटोदेकर आता समाजवादी पार्टीत आहेत. ते मात्र पक्षाच्या काही उमेदवारांच्या सभेमध्ये दिसले.
पुरोगामी व डाव्या चळवळीतील अनेक नेत्यांचा स्थानिक राजकारणात दबदबा होता; पण भाजपा-काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादी व दोन शिवसेना यांच्यातील राजकीय साठमारीमध्ये जनता दल, भाकप, शेकाप आदी जुने पक्ष व या पक्षांचे सध्याचे नेते लुप्त झाले आहेत.
निवडणुकीच्या धामधूमीत जनता दलाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गंगाधर पटने यांचे रविवारी निधन झाले. जनता दलाला या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करता आला नाही; पण 1997 साली मनपाच्या पहिल्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत काँग्रेसला दूर ठेवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. तेव्हा जनता दलातर्फे निवडून आलेल्या उमेदवारांचे नेतृत्व पटनेंकडेच होते. महापौरपद शिवसेनेकडे गेल्यानंतर उपमहापौरपद जनता दलाकडे आणण्यात पटनेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.