

Nanded There is no transport initiative in any local government institution
नांदेड, पुढारी वृत्तसेवा १६ तालुक्यांच्या नांदेड जिल्ह्यात १३ नगर परिषदा व चार नगर पंचायती तसेच केंद्रस्थानी नांदेड महानगरपालिका आहे; परंतु एकाही ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची परिवहन सेवा नाही. गुर-ता-गद्दी निमित्त जेएनएनयुआरएम कार्यक्रमांतर्गत महानगर पालिकेला मोठ्या व लहान बसेस मिळाल्या होत्या. काही दिवस शहरांतर्गत परिवहन सेवा चालवण्यात आली; परंतु मागील अनेक वर्षांपासून ती बंद पडली आहे.
अन्य देशांतून आयात करावे लागणारे इंधन तसेच त्यावरील अब्जावधी रुपयांची बचत व्हावी, लोकांना सुरक्षित प्रवास करता यावा, नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागू नये, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, अशा अनेक उद्देशांच्या पुर्ततेसाठी सार्वजनिक परिवहन सेवा हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात येतो. त्यासाठी शहराच्या रचनेच्या दृष्टीने सोयीस्कर मोठ्या व लहान बसेस चालविल्या जातात.
नांदेड महानगर पालिका १९९७ साली स्थापन झाली. तत्पुर्वी एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून शहर वासियांना सिटीबस सेवा पुरवली जात असे. नांदेड येथे सुद्धा वर्कशॉप ते सिडको-हुडको, हबीब टॉकीज, नाईकनगर, भाग्यनगर, असर्जन अशा वेगवेगळ्या मार्गावर सिटी बसेस धावत. कमी तिकीट आणि सुरक्षित प्रवास यामुळे या बसेसना प्रतिसादही उत्तम मिळत असे; परंतु ऑटोकडे सुशिक्षित बेर ोजगारांचा कल वाढल्याने यावर थोडा परिणाम झाला.
महानगर पालिकेच्या स्थापनेनंतर एस.टी. महामंडळाने अंग काढून घेतले. ज्या ठिकाणी महानगर पालिका आहे, तिथे एस. टी. शहरांतर्गत परिवहन सेवा देत नाही. कारण ती जबाबदारी महानगर पालिकेवर असते. अगोदर मनपाने लालपरी नावाने काही दिवस सिटी चस सेवा चालविली. पुढे २००८ मध्ये गुर-ता-गद्दी समारोहाच्या निमित्ताने नांदेडचा समावेश केंद्राच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजनेत झाला.
जेएनएनयुआरएम अंतर्गत नांदेडला मोठ्या व लहान आकाराच्या सुमारे ५० बसेस मिळाल्या. त्याला प्रतिसादही चांगला होता. परंतु मेंटेनन्सच्या नावाखाली काही बसेस बंद ठेवण्यात येत. पुढे रस्ते अरुंद असल्याचे कारण दिले गेले. या प्रकारे वातावरणनिर्मिती झाल्यानंतर मध्येच बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. सध्या मागील काही वर्षापासून नागरिक ऑटो किंवा मग स्वतःच्या वाहनांवर अवलंबून आहेत.
सार्वजनिक परिवहन सेवा नसल्यामुळे सर्वातनि लोकांची गोची होते. नाईलाजाने लोकांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे इंधनाचा प्रचंड वापर वाढला आहे. चारचाकी वाहनात एकच व्यक्ती प्रवास करते. त्यामुळे इंधनाबरोबरच रस्ताही आटतो. दुचाकी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली असून वाहतूक कोंडी नित्याची बाब होऊन बसली आहे. महानगर पालिकेप्रमाणेच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात दिसून येते.