

नायगाव : तालुक्यातील मौजे ताकबिड येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत हजारो कड्डबा मुक्या जनावराचा (चारा) तसेच एका म्हशीचे सहा महिन्यांचे वगारू व छप्पर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उष्णतेची तीव्रता वाढत असताना अशा घटनांमध्ये वाढ होत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे ताकबिड येथील गट क्रमांक १८४ मधील शेतकरी शेख जिलानी चांदसाब यांच्या शेतात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. शेतात साठवून ठेवलेला हजारो कड्डबा ची गंजी जळून खाक झाला. याचवेळी झाडाला बांधून ठेवलेले म्हशीचे सहा महिन्यांचे वगारूही व छप्पर आगीत सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या संदर्भात शेतकरी शेख जिलानी चांदसाब यांच्याशी संपर्क साधला असता, “ही आग नैसर्गिक नसून कोणीतरी जाणीवपूर्वक लावून दिली असावी,” अशी शंका त्यांनी व्यक्त केली. याबाबत संबंधित विभागाकडे रीतसर तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.