

नांदेड : जिल्ह्यात हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल ६५ लाख ३७ हजार रुपये किमतीचे ४७१ मोबाईल शोधण्यात नांदेड पोलिसांना मोठे यश आले आहे. हे सर्व हस्तगत केलेले मोबाईल आज एका विशेष कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मूळ मालकांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड पोलिसांनी राबवलेल्या तंत्रज्ञानाधारित मोहिमेचे हे फलित आहे. मोबाईल गहाळ झाल्यानंतर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींच्या आधारे, सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांनी केंद्र सरकारच्या 'CEIR' प्रणालीचा प्रभावी वापर केला.
अवघ्या काही महिन्यांतच देशातील विविध राज्यांतून आणि जिल्ह्यांतून हे महागडे मोबाईल शोधून काढण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड पोलिस दलाचे जाहीर कौतुक केले. ते म्हणाले, "नांदेड पोलिसांनी तांत्रिक क्षमतेच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला आहे."
पोलिस प्रशासनाचे आवाहन
मोबाईल हरवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी आणि CEIR पोर्टलवर माहिती अपलोड करावी, जेणेकरून मोबाईल शोधणे सोपे होईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.
अशी आहे शोध पथकाची टीम
ही धडक कारवाई अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, अर्चना पाटील, सायबर पोलिस निरीक्षक वसंत सप्रे, उपनिरीक्षक मारोती चव्हाण, आशिष बोराटे आणि अंमलदार राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, विलास राठोड, कांचन कसबे यांच्या पथकाने यशस्वी केली.