

Nanded Maregaon agriculture electricity cut
किनवट : मौजे मारेगाव (वरचे) येथील शेतशिवारातील कृषी पंपांचा वीज पुरवठा जून 2025 पासून पूर्णपणे खंडित असून तब्बल वर्षभर उलटूनही तो पूर्ववत न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्राणांतिक उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मारेगाव (वरचे) परिसरातील शेतकऱ्यांनी किनवट येथील उपकार्यकारी अभियंता, महावितरण यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, 10 नोव्हेंबर आणि 22 डिसेंबर 2025 रोजीही लेखी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी कृषी पंपांचा वीजपुरवठा अजूनही बंदच आहे.
वीज नसल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला आणि इतर पिकांना वेळेवर पाणी देता आले नाही. त्यामुळे अनेक पिके करपून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधीच नापिकी, वाढते कर्ज, शेतीमालाला मिळणारा कमी दर आणि नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी अडचणीत असताना वीजपुरवठा खंडित राहिल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येणारा खरीप हंगाम तोंडावर असतानाही परिस्थिती सुधारलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
कृषी वीजपुरवठा तातडीने सुरू करावा आणि झालेल्या नुकसानीची दखल घेऊन योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी रामराव सुबराव जाधव, रामकिशन कोंडीबा पवार, दिगांबर वसंत भोसले, दत्ता दादुजी भोसले, सतीश ठोंबरे, वसंत दादोजी भोसले यांच्यासह समस्त शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, कृषी मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.