

Nanded Kinwat Communist Party Protest
किनवट : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचा प्रलंबित पीकविमा तसेच खत व बी-बियाणांच्या वाढलेल्या किमती यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) यांच्या वतीने बुधवारी (दि. २८) किनवट येथील जिजामाता चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत घोषणाबाजी केली. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या दरांवर नियंत्रण आणावे, शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा तातडीने मंजूर करावा तसेच खत व बी-बियाणांच्या किमती कमी कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी ईडीने टाकलेल्या धाडीचाही आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
आंदोलनाला संबोधित करताना माकपचे नेते कॉ. अर्जुन आडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि तरुणांच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
या आंदोलनात जनार्दन काळे, इंदल राठोड, प्रशांत जाधव, शेषराव ढोले, सीताराम आडे, सुनील राठोड, बाणा कोतुरवार, नामदेव चव्हाण, श्यामराव धुपे, महेमूद पठाण, सिनू आडे, अर्चना काळे, रंगराव चव्हाण, यशवंत राठोड, धनलाल नाईक, विनोद कदम यांच्यासह किसान सभा, डीवायएफआय आणि सीटू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनांच्या वतीने देण्यात आला.