

Nanded Shiv Sena Politics
किनवट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याचे आव्हान दिले. मतदारसंघाच्या विकासापेक्षा वैयक्तिक आणि कौटुंबिक हितसंबंधांना प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
किनवट येथील नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
खराटे म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आष्टीकर यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाला त्यांच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. तसेच मतदारसंघातील विकासनिधी आणि प्रलंबित कामांबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
किनवट आणि माहूर तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाशी निष्ठावंत असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेदरम्यान नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार आणि युवानेते करण एंड्रलवार यांच्या अनुपस्थितीबाबत उपस्थित पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावर खराटे यांनी दोघांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून पक्षाच्या भूमिकेबाबत त्यांच्यात कोणताही संभ्रम नसल्याचे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील, शहरप्रमुख तथा नगरसेवक प्रशांत कोरडे, बांधकाम सभापती श्रीराम नेम्मानीवार, माजी शहरप्रमुख संतोष येलचलवार, युवासेना तालुकाप्रमुख अतुल दर्शनवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.