

Flood News Kinwat Nanded
किनवट : किनवट तालुक्यातील निचपूर येथे सततच्या मुसळधार पावसामुळे जंगलातून आलेल्या पुराच्या पाण्यासोबत सुमारे ११ ते १२ फूट लांबीचा महाकाय अजगर गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अजगराला सुरक्षितरीत्या पकडून गावाबाहेरील तळ्यात सोडले. या घटनेनंतर जंगलातील पुराचे पाणी गावात येऊ नये यासाठी पूर संरक्षण भिंत तसेच उर्वरित नालीच्या कामाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
निचपूर गावालगत घनदाट जंगल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात जंगलातून येणारे पुराचे पाणी गावात शिरते. या पाण्यासोबत साप, अजगर, विंचू आणि इतर वन्य प्राणीही नागरी वस्तीत प्रवेश करतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावेळी गावात आलेला अजगर काही भक्ष्य गिळल्यामुळे सुस्त अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते महेश मुंडे यांनी सांगितले की, जंगलातून येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे निचपूरमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यापूर्वी जंगली डुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यांच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रात विषारी साप आढळणे आणि गावातील नाल्यांमध्ये अजगर दिसणे, अशा घटना सातत्याने घडत असल्याने वन्यजीवांचा गावातील प्रवेश रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मागील वर्षी नालीचे काही काम पूर्ण झाल्याने पुराचा फटका काही प्रमाणात कमी झाला असला, तरी उर्वरित नाली आणि पूर संरक्षण भिंतीचे काम अद्याप रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यास जंगलातील पुराचे पाणी गावात शिरणार नाही आणि ते बाहेरील मार्गाने वाहून जाईल. परिणामी वन्य प्राण्यांचा गावातील प्रवेशही मोठ्या प्रमाणात रोखता येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या कामासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यास तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश मुंडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.