

Fire incident Nanded district news
हिमायतनगर : सिरपली गावातील एका घराला बुधवारी (दि. १८) दुपारी अचानक आग लागून घरात बांधून असलेल्या सहा बकरी व घरातील अन्नधान्य जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सिरपली गावातील किसन आबाजी जाधव यांच्या घराला बुधवारी दुपारी अचानक आग लागली . या दुर्घटनेत घरात बांधून असलेल्या शेळीचे सहा पिल्ले व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी तलाठी सबन्नवार, पशुवैद्यकीय अधिकारी ऐवतीकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेत एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून तातडीने मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
नायगाव : तालुक्यातील मौजे हुस्सा येथे शेतकरी रावसाहेब आबाजी हंबर्डे यांच्या शेतातील दोन एकरांवरील हरभऱ्याचा ढिग अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हंबर्डे यांच्या गट क्रमांक २८९ मधील दोन एकर क्षेत्रात हरभऱ्याचे पीक घेण्यात आले होते. या पिकातून सुमारे २० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित होते. १४ फेब्रुवारी रोजी हरभऱ्याची कापणी करून तो शेतात ढिग करून ठेवण्यात आला होता. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने काडीपेटीच्या साहाय्याने जाणूनबुजून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, गावात श्री द्वारकाधीश मंदिर येथे कलशारोहणानिमित्त श्रीमद् भागवत कथेमुळे भक्तिमय वातावरण होते. बहुतांश ग्रामस्थ कार्यक्रमासाठी गेले असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.