

Nanded Heavy Rain
उमरी, पुढारी वृत्तसेवा: काय करावं देवा. कुणाला सांगावं. जो तो येतो फोटो काढतो. मात्र मदत कोणीच देत नाही. आभाळ फाटले. शेत करपले. शेतकऱ्यांचे ताट रानातच हरपले. अशी अवस्था कृषीप्रधान असलेल्या देशातील शेतकऱ्यांची झाली आहे. उमरी शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
शुक्रवारी संततधार आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचले. हाताला आलेले मूग गेले.. उडीद गेले.. सोयाबीन गेले... कापूस गेला.... काही ठिकाणच्या जमिनी वाहून गेल्या. गोदावरीनदीच्या बॅक वॉटर मुळे शेतकऱ्यांची दैना झाली. महागाईचे बियाणे शेतात टाकले. रसायनिक खते टाकली.
यंदा उत्पन्न वाढेल. चार पैसे हातात येतील. अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा निराशा आली. काय करावे कळत नाही देव कोपला. पिके गेली. अनेकांची जनावरे वाहून गेली. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या बळीराजाला शासकीय मदतीची गरज आहे. शंभर टक्के पिक विमा मंजूर व्हावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी. यासाठी शासन दरबारी सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने कहरच केला आणि शेतातील सर्वच वाहून नेले. शनिवारी देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. गोदावरी नदीला महापूर आला. ग्रामीण भागात जाणाऱ्या अब्दुलापूरवाडी, हातनी, बेलदरा, येंडाळा, महाटी, कौडगाव, कुदळा, बोळसा, ईज्जतगाव जाणाऱ्या रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दिवसभरासाठी वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे अनेकांनी उमरी शहरात येण्याऐवजी घरातच बसणे पसंद केले. शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यात मुसळधार सुरूच असून चार तालुक्यांसह ३९ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी आठ वाजेतो तो शतकापार गेला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ३३६ मि.मी. पाऊस झाला आहे. हा सरासरीपेक्षा दुप्पट अधिक आहे. १ जूनपासून आजतागायत ८९४.५ मि.मी. पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीपेक्षा १२६ टक्के जास्त आहे.
मांजरा, रेणा, तावरजा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली असून नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नद्यांना पूर आले आहेत व पुराचे पाणी शेता- गावांनी शिरल्याने तिथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी अपघातही घडले. देवणी तालुक्यातील चवण हिप्परगा येथे जुना बुरुज कोसळून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला. औसा तालुक्यात वीज कोसळून एका शेतकऱ्याची म्हैस ठार झाली, तर चोबळी येथे एका शेतकऱ्याचा बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला. पूरस्थितीमुळे चाकूर शहरातील २० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अहमदपूर, लातूर आणि उदगीर तालुक्यांमध्ये पाच नागरिक अडकले होते, त्यांची होमगार्ड व शोध-बचाव पथकांनी सुखरूप सुटका केली. दरम्यान, जिल्ह्यातील ५६ पेक्षा जास्त रस्ते व पुलांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. माकणी-चोबळी, उदगीर देगलूर, निलंगा-कासारशिरशी, रेणापूर-कालवाडी यांसह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. काही गावांचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पहाणी केली.