

हिमायतनगर: तालुक्यात पहिल्यांदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटून अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा संततधार सुरू असल्याने पावसामुळे शेतातील उभे असलेल्या सोयाबीनला आता कोंब फुटू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची काळजी अधिकच वाढली असून पिकांच्या अशा अवस्थेमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांना पिकांचा शंभर टक्के फटका बसला असून प्रशासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे. तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप दिसत आहे.
यंदा पेरणी केल्यानंतर सोयाबीन उगवलेच नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. त्यानंतर कशीबशी पेरणी झाली आणि सोयाबीन पीक चांगले उगवले होते. परंतु ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खरडून पूर्ण जमिनी खरडलेल्या असल्यामुळे शेतातील पिके उध्वस्त झाल्याचे चित्र होते.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील मुसळधार पावसाची रिपीरिप सुरूच ठेवली आहे. या महिन्यात देखील काढणीला आलेले सोयाबीनला आता सततच्या पावसामुळे कोंब फुटत आहेत. काढणीला आलेले सोयाबीन जाण्याची वेळ आली असल्यामुळे अशी विदारक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. तसेच शेतात काही असलेल्या कापसाच्या झाडांना देखील प्रमाणात बोंडे उगवले होते ते बोंडे देखील या पावसाने गळून पडत असून काळवट पडली आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा काळवटल्या आहेत. तर कापसाचे बोडांची देखील तीच अवस्था झाली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु त्या मदतीतून शेतकरी सावरणार नाही अशी भयानक परिस्थिती या तालुक्यात झालेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यातून होत आहे.