

नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौर कविता मुळे यांनी शंभर दिवसांचा विकासाचा अजेंडा तयार करून राबविण्यास सुरुवात केली मात्र, या योजनेतील पहिल्याच योजनेला गळती लागल्याचे चित्र पहायला मिळत असून, कौठा भागात प्रायोगित तत्त्वावर सुरू केलेल्या 24 तास पाणीपुरवठा योजनेचा फज्जा उडाला असून, त्यामुळे प्रायोगीकचा प्रयोग फसला असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
नांदेडच्या विष्णुपुरी जलाशयात मुबलक साठा असल्याने शहरातील कौठा भागातील कांही नळानां मिटर बसविण्यात आले आहे. मिटर नुसार नळपट्टी येईल व चोविसतास पाणी पुरवठा होईल असा दावा महापालिकेच्यावतीने करण्यात आला होता. प्रयोगित तत्त्वावर कौठा भागातील 1414 घरांना या योजनेचा लाभ मिळणार होता.
त्यानुसार महापौर कविता मुळे स्थानिक नगरसेवकांनी मोठा गाजावाजाकरत या योजनेचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री तथा अशोक चव्हाण यांच्या हस्ते कौठा येथे 30 मार्च रोजी करून घेतला. व महापौरांच्या शंभर दिवसांच्या विकासाच्या कृती आराखडाचा प्रमुख भाग असलेल्या 24 तास नळाला पाणीपुरवठा योजनेला सुरुवात झाली. 30 मार्च दिवसा नंतर गेल्या चार दिवसांत 1414 घरांपैकी अनेक घरांना नळाला पाणीच आले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पालिकेच्या उदासीन धोरणामुळे चोविसतास पाणीपुरवठा योजनेचा फज्जा उडाला असल्याचे दिसते.
महापालिकेच्या पुरवठा विभागाने कौठा भागातील रविनगर, बसवेश्वरनगर, विकासनगर, श्रीपादनगर अशा भागातील जवळपास नळालांना मिटर बसविले आहेत. प्रयोगित तत्त्वावर हे मीटर बसविले आहे.भविष्यात संपूर्ण शहरातील नळाला मीटर बसवून जसे पाण्याचा वापर कराल त्या मीटरवरून संबंधित नळधारकाला त्या पध्दतीने बिल येणार अशी संकल्पना आहे.
राज्यातील अनेक भागात ही योजना सुरू आहे.नांदेडमध्येही ही योजना सुरू करण्याबाबत महापालिका आगृही आहे. मात्र, उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी 1414 घरांना 24 तास पाणी आले त्यानंतर बहुतांश घरांना पाणीच आले नाही गेल्या चार दिवसांंपासून या भागात पाणी नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांना शुक्रवारी या बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबधित पाणीपुरवठा विभागाला याबाबत विचारणा केली. त्यानंतर ही यंत्रणा खडबडून जागे झाली आणि दुपारी पुरवठा सुरळीत केला मात्र, त्यानंतर अवघ्या दोनच तासांत पुन्हा नळाला पाणी येणे बंद झाले त्यामुळे या योजनेच्या अमलबजावणीसाठी तज्ञ व्यक्तिंची नियुक्ती केली नाही का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
30 मार्च रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कौठा येथील एका जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर चोविस तास पाणीपुरवठा योजनेचा प्रायोगिक तत्वावर शुभारंभ केला मात्र, यात आरंभशुरांनी योजनेचा आरंभ धुमधडाक्यात केला परंतु त्यानंतर त्याकडे ढुंकुंनही पाहिलं नाही असेच एकंदर परिस्थितीवरुन दिसते. गेल्या कांही वर्षांपासून प्रशासकराज महापालिकेत होते आता लोकप्रतिनिधी आले आहेत त्यामुळे यांच्यातील समन्वय अद्याप झालेला दिसत नसल्याचे या योजनेच्या उडालेल्या फज्जावरुन दिसते.
सहा महिने अडचणी येणार - सौदे
कौठा भागात प्रायोगित तत्त्वावर चोवीस तास नळाला पाणी योजना सुरू केली आहे. मात्र, कांही तांत्रिक कारणामुळे यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अडचणींवर मात करत या योजनेतून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळात आणखी व्यवस्थित पाणीपुरवठा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नगरससेवक अभिषेक सौदे यांनी म्हटले आहे.
चोवीस तास मनस्ताप..
महापालिकेने नळाला चोवीस तास पाणी देण्यारी योजना कौठा भागातील काही नगरांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. ही योजना यशस्वी झाली तर संपूर्ण शहरात योजना राबविली जाणार आहे. मात्र, ही योजना 24 तास सुरळीत नंतर खंडित झाल्याने भरपूर गाजावाजा करून केलेल्या उद्घाटनामुळे नागरिकांत आनंदावर विरजण पडले आहे आणि नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.