

विठ्ठल फुलारी
भोकर : पावसाचे पाणी अडवून पाणी पातळीत वाढ करणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने आता जल शक्ती अभियान सुरू केले असून ‘कॅच द रेन’ या उपक्रमाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. या अनुषंगाने समिती गठीत करून छोट्या छोट्या उपक्रमातून भुजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मागील काही वर्षापासून शोषखड्डे, वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या जमिनीत पाणी मुरवणाऱ्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, आता शासनाने याबाबत सकारात्मक विचार केला असून ‘कॅच द रेन’ या उपक्रमात या बाबींचा समावेश केला आहे. छतावरील पावसाचे पाणी साठविण्यासाठी इमारतीवर वॉटर हार्वेस्टिंगची बांधकाम करणे, इमारतीच्या आवारातील पाणी मुरविण्यासाठी शोषखड्डे घेणे, अस्तित्वातातील जलसंधारणाची कामे सुव्यवस्थित ठेवणे, नवीन साठवण तलाव, बंधारे बांधणे.
पाणी साठवावयाच्या पारंपरिक साठ्याचे पुनरुज्जीवन करणे, पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणे दुर करणे, तलावातील गाळ काढणे, विंधन विहिरीचे पुनर्भरण करणे, छोट्या नद्या, नाले, ओढे यांचे पुनरूज्जीवन करणे, पाणथळ जमीनीचे संरक्षण करणे, पाण्याच्या उद्भवांचा विकास करणे या छोट्या छोट्या गोष्टी चा यात समावेश करण्यात आला आहे. या कमी खर्चीक आणि लहान लहान गोष्टीतून भुजलपातळी वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मागील काही वर्षांपासून भोकर तालुक्यातीतून शेकडो दशलक्ष घनमीटर पावसाचे पाणी वाहून जात आहे. मागील वीस वर्षात भोकर तालुक्यात मोठा प्रकल्प उभा राहिला नाही. पिंपळढव साठवण तलाव व सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याचे कामावर केवळ भाषणबाजी चालू असते. त्यामुळे आमच्या भागात पडलेल्या पावसामुळे तेलंगणातील शेतकरी सुखी होत आहे.
दरम्यान, सरासरीपेक्षा जास्त पाऊस होवूनही यावर्षी अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे भोकर तालुक्याला ‘कॅच द रेन’ या उपक्रमाची खरी गरज आहे. याबाबत जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करण्यात येणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे.
‘कॅच द रेन’मध्ये सहभागी झाले तरच वाचाल...
मागील अनेक वर्षापासून रासायनिक खतांचा वापर बेसुमार करण्यात आला. याचा परिणाम आता दिसू लागला आहे. अति रासायनिक खतांचा वापर झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक कमी झाले आहेत. यामुळे जमीन टणक झाली आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी झाली. यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तरी हे पाणी मोठ्या प्रमाणात जमीनीत मुरत नाही. ‘कॅच द रेन’ या उपक्रमातून वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे, तलावातील गाळ काढणे या कामातून जमिनीत पाणी मुरविण्यात येणार आहे. यामुळे ‘कॅच द रेन’ उपक्रमामध्ये सहभागी झालात तर वाचाल अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.
उपक्रमाला लोकसहभागाची आवश्यकता...
यातील अनेक उपक्रम कमी खर्चिक आहेत. शोषखड्डे व वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक कुटुंबाने केले त्यांच्या बोअर ची पाणी पातळी वाढली जाणार आहे. यामुळे या उपक्रमाला लोकसहभागाची आवश्यकता आहे. तरच हे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. जल आंदोलन हे जन आंदोलन झाले की भूजल साठा वाढला जाणार आहे. हे मात्र निश्चित आहे.