

नांदेड ः नांदेड - महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा ‘राष्ट्रीय जल दिन’ म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर यांनी हैदराबाद येथे खा. ओवेसी यांची भेट घेऊन सदर मागणीसंदर्भात चर्चा केली होती. खा. ओवेसी यांनी पत्रात म्हटले आहे की, महाडच्या चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरातील शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालये या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित झाले पाहिजेत, शिवाय जनजागृतीसाठी केंद्र सरकारमार्फत प्रयत्न व्हायला हवेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड (जि. रायगड) येथे पार पडलेला ‘चवदार तळे सत्याग्रह’ हा भारताच्या सामाजिक समतेच्या इतिहासातील एक क्रांतिकारक प्रसंग आहे. या दिवशी प्रथमच अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या तळ्यावर समान हक्काने प्रवेश मिळाला. हा दिवस भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचा पाया घालणारा म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे.