

किनवट : किनवट व आदिलाबाद परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवाशांना रेल्वे प्रवासात येणाऱ्या अडचणींची दखल घेत, मराठी पत्रकार परिषदेच्या किनवट शाखेने रेल्वे प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करून, प्रवासी सेवांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या किनवट स्थानक पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने हे निवेदन देण्यात आले. अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा विकास होत असला, तरी प्रत्यक्ष गाड्यांच्या सुविधांबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाहणीसाठी आलेल्या महाव्यवस्थापकांनी अवघ्या काही मिनिटांतच आपला दौरा आटोपल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. किनवटसारख्या महत्त्वाच्या आणि महसूल देणाऱ्या स्थानकावरील समस्या समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुरेसा वेळ दिला नाही, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर, के. मुर्ती, गोकुळ भवरे, किरण किनवटकर, माजी अध्यक्ष दुर्गादास राठोड, तालुका सचिव बालाजी सिरसाठ, कचरू जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनातील प्रमुख मागण्या
वेळेत बदल : रेल्वे क्रमांक 57654 ची किनवटवरून सुटण्याची सध्याची वेळ गैरसोयीची असून, ती सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान करावी.
प्रवासी डब्यांची वाढ : आदिलाबाद-पूर्णा-आदिलाबाद (77616/77615) या गाड्यांना सध्याचे जुने डबे काढून नवीन प्रवासी डबे जोडण्यात यावेत.
गाडीचा विस्तार : पुणे-नांदेड किंवा हडपसर-नांदेड या गाडीचा विस्तार थेट आदिलाबादपर्यंत करावा, जेणेकरून महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांतील प्रवाशांची सोय होईल.