

धर्माबाद | पुढारी वृत्तसेवा
शहरातील गजबजलेल्या भागातील तीन अन्नस्थापनांमधील मिठाई व खाद्यपदार्थांमध्ये भेसळ व निकृष्ट दर्जाची विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखेर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या दुकानांवर सोमवारी (ता. १६) अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत पाच औपचारिक व दहा अनौपचारिक असे एकूण 15 अन्ननमुने घेण्यात आले. या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील गणपती मिठाई भांडार व उत्पादन केंद्र तसेच बालाजी मिठाई भांडार या दुकानांमध्ये अस्वच्छता, उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ तसेच साठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळून आल्या. यावेळी अन्नसुरक्षा अधिकारी अरुण तमडवार व अ. भ. भिसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या त्रुटींवर आक्षेप नोंदवला. ही तपासणी अन्न व औषध प्रशासनच्या अन्नसुरक्षा पथकाने केली.
जप्त केलेले अन्ननमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळल्यास संबंधित दुकानांचे परवाने रद्द करणे, दंडात्मक कारवाई करणे तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आठवडाभर नागरिकांना उलट्या, पोटदुखी व मळमळ यांचा त्रास झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच ही कारवाई झाली. घटना घडल्यानंतरच तपासणी का केली जाते? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नियमित तपासणी व अचानक छाप्यांची मागणी जोर धरत आहे.
गणपती मिठाई भांडार व उत्पादन केंद्र तसेच बालाजी मिठाई भांडार याबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या होत्या. मात्र ठोस कारवाई झाली नव्हती. त्यामुळे यामागे काहींची मिलीभगत तर नाही ना? असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. वारंवार तक्रारी होऊनही कारवाई न होणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
शहरातील तीन अन्नस्थापनांमधून भेसळ प्रकरणी पाच औपचारिक व दहा अनौपचारिक असे एकूण १५ अन्ननमुने घेण्यात आले आहेत. सदर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. अहवाल आल्यानंतर दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.
— अरुण तमडवार, अन्नसुरक्षा अधिकारी