

Due to the cold wave from the north, there is a chill in Nanded district.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरात किमान तापमानाचा पारा आठवडाभरापासून सातत्याने घटत असल्याने थंडीचा जोर अद्यापही कायम आहे. सोमवारी (दि.२९) शहरात ११ अंशांवर किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. कमाल तापमानातही फारशी वाढ होत नसल्याने किमान तापमान कमीच राहत आहे.
कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमानाचा पारा ११ अंशांवर राहत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. दरम्यान उत्तरेकडील शीतलहरींमुळे पुढील सहा दिवस पारा १० अंशांवर राहणार आहे, असे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने सांगितले.
राज्यात धुळे, नंदुरबार नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातही थंडीचा कडाका कायम आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातपर्यंत थंडीची तीव्रता टिकून राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. शहरात थंडीचा अनुभव नागरिक, तसेच रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणारे शेतकऱ्यांना अनुभवास येत आहे. डिसेंबर महिन्यातील कडाक्याची थंडी असल्याने नांदेडची बाजारपेठ रात्री शांत दिसत आहे.
उत्तरेतील उच्च दाबाच्या परिणामामुळे थंडीची लाट
उच्च वायुदाब उत्तर भारतात सक्रिय असल्याने निरभ्र आकाश आणि कोरडे वारे वाहत आहेत. ज्यामुळे रेडिएटिव्ह कुलिंग वाढून रात्रीच्या वेळी थंडी जरा जास्तच जाणवते. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील शीतलहरीमुळेही जास्त गारठा आहे.
पंजाब, हरियाणात किमान तापमान २ ते ५ अंशांपर्यंतची नोंद झाली आहे. तेथील अतिशय थंड वारे उत्तर, पश्चिम वाऱ्यांसोबत महाराष्ट्राकडे सरकत आहे, असे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने सांगितले आहे.