

Discharge from Vishnupuri continues for the third day, many villages in Nanded district still under water
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड जवळच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे सलग तिसऱ्या दिवशीही उघडे ठेवावे लागले. त्यातून १ लाख २२ हजार क्युसेस प्रवाहाने पाणी सोडले जात आहे. शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी गोदावरी नदीतील पाणी पातळी ३५० मीटरवर होती.
मागील चार दिवसांपासून गोदावरी नदीच्या पात्रातून प्रचंड वेगामध्ये पाणी वाहत असल्यामुळे शहरातील नदीकाठच्या भागातील जिल्ह्यातील अनेक गावेही पाण्याखालीच आहेत. उत्तरा नक्षत्र संपतासंपता जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळे अतिवृष्टी पुन्हा होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शुक्रवारी शहरामध्ये सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातही जोरदार पाऊस झाल्यामुळे जनजीवन सुरळीत होण्याऐवजी परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.
दसऱ्याचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना अतिवृष्टी, पूर, पीक आणि मालमत्तांची झालेली वाताहत अशा दारुण परिस्थितीचा शहरी तसेच तालुकास्तरीय बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४३० नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित केले आहे.
मुखेड तालुक्यात मागील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनश्च अगमन झाले असून शुक्रवार, दि.२६ रोजी दुपारी चारपासून विजेच्या कडकडाटासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता.