

Devendra Fadnavis: Ladki Bahin scheme, it will continue, the resolve of Lakhpati Didi
लोहा, पुढारी वृत्तसेवा आजवर अनेक सरकारे आली; परंतु त्यांनी शहरांकडे दुर्लक्ष केले. २०१४ मध्ये आमचे सरकार आले तेव्हापासून आम्ही शहरी विकासाच्या अनेक योजना आणल्या आहेत. लोहा-कंधार शहरातही पिण्याचे शुद्ध पाणी, सांडपाण्याचा निचरा, आरोग्य, उच्च शिक्षण आदी प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा शब्द आहे. मतदारांनो, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला सुवत्ता देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लाडकी बहीणच्या माध्यमातून विधानसभा जिंकली. लखपती दीदीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचे संकेत या सभेतून मिळाले.
लोहा व कंधार नगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२७) दुपारी दीडच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार आदींसह लोहा नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी व कंधार नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार व इतर मान्यवर उपस्थित होते.
खरा भारत खेड्यात आहे, असे म्हटले जाते. ते खरेही आहे; परंतु आजवरच्या सरकारांनी ना खेड्याकडे लक्ष दिले ना शहराकडे. त्यामुळे आज शहरांची बकाल अवस्था झाली आहे. गावांकडे दुर्लक्ष झाल्याने लोक शहरात आली आणि इथे राहायला जागा नसल्यामुळे झोपड्या टाकून राहू लागली. त्यामुळे सांडपाणी, मैला वाहून जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. घनकचऱ्याच्या थप्प्याच्या थप्प्या लागलेल्या दिसून येतात. यामुळे दुर्गंधी पसरून डासांची पैदास होते व आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
सत्ता भाजपाच्या हाती आल्यानंतर शहराचे रूप पालटण्याच्या योजना आमच्याकडे आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी, भुयारी गटार योजना, उत्तम रस्ते, घनकचऱ्यावर प्रक्रिया करून कोळशाचे पॅलेट तयार करणे यासारखी कितीतरी कामे सध्या विविध शहरांत सुरू आहेत. ती प्रत्येक शहरात करण्याचा आमचा मानस आहे; परंतु शहराची सत्ता हाती आल्यास आमच्या हक्काच्या नगरसेवकांचा कान धरून त्याला काम करायला लावता येईल अन्यथा दिलेला निधी मध्येच जिरून जाईल, असे सांगत त्यांनी बहुमताने नगरपालिका भाजपाच्या हाती देण्याचे आवाहन केले.
राज्याच्या १३ कोटी जनतेपैकी ५० टक्के जनता गावात, तर ५० टक्के शहरात राहते. त्यामुळे गावे तर सुध ारली पाहिजेत; परंतु शहरांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शहरी भागातून सुमारे ६५ टक्के जीडीपी तयार होतो. सोशल लाईफ प्रत्येक शहरात निर्माण करण्यावर आमचा भर आहे. प्रत्येक शहरात उद्यान, मैदान, दवाखाने, शाळा याकरिता मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येणार आहे. आमच्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी आम्ही इलेक्शन लढत नाही तर आमच्याकडे त्या शहराच्या विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे लोहा, कंधार नगरपालिका बहुमताने भाजपाच्या ताब्यात देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान लोकस्वराज्य आंदोलनच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना अचानक लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती उपवगीर्करणाचे काय झाले, असा प्रश्न विचारत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निमार्ण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत गोंधळ घालणारया कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. १) अशोक राघोजी गायकवाड, रा. राहुलनगर वाघाळा, संभाजीराजे वाघमारे, रा. बारूळ, ता कंधार, साहेबराव वाघमारे रा. बाचोटी कॅम्प तालुका कंधार, गोविंद रोडे, रा. कापशी तालुका लोहा असे गोंधळ घालणारया कार्यकर्त्यांची नावे आहेत. दरम्यान मुख्यमंत्री आज नांदेड शहरात असल्याने लोकस्वराज्य आंदोलनाच्या संस्थापक अध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राठोड, पवार निश्चिंत राहा
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी मुखेडमधील हद्दवाढ व १०८ कोटींची भुयारी गटार योजना या प्रश्नांचा उल्लेख करीत निवडणुकीनंतर हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तर आ. राजेश पवार यांना उमरी व धर्माबादेतील विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला. भाषणाच्या सुरुवातीला खा. अशोक चव्हाण यांचे नाव घेतले खरे; परंतु भोकर मतदारसंघातील दोन पालिका व एका नगरपंचायतीतही अनेक प्रश्न असल्याचा त्यांना बहुदा विसर पडला, अशी चर्चा सभेनंतर ऐकायला मिळाली.
... तोपर्यंत लाडकी बहीण आनंदात
तुमचा । देवाभाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री पदावर आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील, असे आश्वासन देताना यावर न थांबता येत्या काळात लखपती दीदी बनवण्याचे काम आम्ही हाती घेणार आहोत. त्यासाठी स्थानिक पातळीवर बळ हवे, असल्याची गरज व्यक्त करत नगराध्यक्षांसह पालिकेवर बहुमत देण्याचे आवाहन केले.