

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत काही अपवाद वगळता अन्यत्र पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाने आता मनपातील स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले, त्यांना स्वीकृत सदस्य करण्यात येऊ नये असे पक्षाने संबंधित शहर जिल्हाध्यक्षांना कळविले आहे.
महाराष्ट्रातील लातूर, भिवंडी, परभणी, कोल्हापूर आदी मोजक्या महापालिकांमध्ये काँग्रेस पक्षाला दखल घेण्याजोगे यश मिळाले. नांदेडमध्ये 24 वर्षे हा पक्ष सत्तेत होता; पण गेल्या महिन्यातील निवडणुकीत हा पक्ष नांदेड मनपात तिसऱ्या स्थानावर गेला. 81 पैकी केवळ 10 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून आले.
मनपातील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार नाही, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे; पण स्वीकृत सदस्यांच्या 8 जागांपैकी केवळ 1 जागा या पक्षाच्या वाट्याला येणार असून त्यासाठी पक्षामध्ये अनेक दावेदार आहेत. निवडणुकीत पराभूत झालेल्या काही उमेदवारांनीही ‘स्वीकृत’वर दावा केला आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये नांदेडच्या काही पदाधिकाऱ्यांंनी पराभूत झालेले उमेदवार स्वीकृत सदस्य होण्याच्या खटपटीत आहेत, याकडे प्रदेशाध्यक्ष तसेच अन्य नेत्यांचे लक्ष वेधले.
मनपा निवडणुकीपूर्वी नांदेड जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. ज्या नगरपालिकांत काँग्रेस पक्षाला स्वीकृत सदस्य नेमण्याची संधी मिळाली. तेथे पराभूत उमेदवारांपैकी कोणालाही स्वीकृत सदस्य करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. प्रदेश काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक 18 फेब्रुवारी रोजी झाली.
तत्पूर्वी वरील बाब नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे त्यावर राजकीय व्यवहार समितीत चर्चा झाल्यानंतर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत सदस्य करण्यात येऊ नये, असा निर्णयच बैठकीमध्ये घेण्यात आला. वरील निर्णय संबंधित शहर जिल्हाध्यक्षांना पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांनी पत्राद्वारे कळविला आहे.
नांदेडचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांना पाठविण्यात आलेले पत्र काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर जारी केल्याचे चित्र दिसून आले. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी घेण्यात आला असावा, असे पक्षाच्या मराठवाड्यातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.