

Cases will be registered against those causing delays in loan disbursement
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : उद्योग व्यवसायासाठी युवक आणि युवतींनी बँकांकडे कर्जासाठी दिलेले प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, अन्यथा संबंधित बँकांच्या व्यवस्थापकाविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करावी लागेल, असा इशारा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथे दिला.
शिवसेना उपनेते तथा उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नांदेड येथे उद्योग भवनात घेतलेल्या उद्योजक आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. ते म्हणाले, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक आदी बँकांनी कर्ज वाटपाचे लक्ष पूर्ण केलेले नाही. शिवाय हे प्रमाण केवळ ७-८ टक्के चया पुढे गेलेले नाही, नांदेडमध्ये कर्ज मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे दिसून येते. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी संबंधित बँकांच्या व्यवस्थापकांना धारेवर धरले होते. पुढील बैठकीपूर्वी दिलेले लक्ष्य पूर्ण न केल्यास व्यवस्थापकांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या विविध अडचणी सांगितल्या. एमआयडीसी परिसरात अग्निशमन शुल्क भरमसाठ आकारले जात असल्याची तक्रार संघटनेच्यावतीने यावेळी करण्यात आली. इतर कोणत्याही जिल्ह्यात प्रति चौरस मीटर सहा रुपये अग्निशमन शुल्क नाही परंतु नांदेड मध्ये मात्र आधी बारा रुपये होते आणि आता ते कमी करून सहा रुपये करण्यात आले ही बाब मंत्री सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून याविषयीचा जाब विचारला.
त्यानंतर ६ रुपये शुल्क कमी करून ते एक रुपया 70 पैसे आकारण्याच्या सूचना उद्योग मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. शिवाय ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या एमआयडीसीच्या जागेत उद्योग सुरू आहेत आणि कर मात्र ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोघांकडूनही होत असेल तर, अशा ठिकाणच्या उद्योजकांनी ग्रामपंचायतीकडे न भरता केवळ एमआयडीसी कडेच कर करावा अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
उद्योजकांना न्याय देणे शासनाचे कर्तव्य
उद्योजकांना न्याय देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, सामंत यांनी दिल्या. यावेळी आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डीले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.