

नांदेड ः नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केवळ दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प नसून, ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना रेल्वे मार्गे जवळच्या अंतराने जोडणारी एक महत्त्वाची मिसिंग लिंक असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याची मागणी आज राज्यसभेत मांडताना ते बोलत होते.
शून्य प्रहरात काळात हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, नांदेड आणि लातूर ही मराठवाड्यातील कृषी व व्यापाराची मोठी केंद्रे आहेत. मात्र, या दोन शहरांत अद्याप थेट रेल्वे मार्ग नाही. सध्या रेल्वेने 212 किमीचा वळसा घालून जाण्यासाठी 6 तास लागतात, तर रस्ते मार्ग 144 किमीचा आहे. प्रस्तावित 104 किमीच्या नवीन थेट रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अवघ्या सव्वा तासात पूर्ण होणे शक्य आहे.
या प्रकल्पाचे व्यापक महत्त्व स्पष्ट करताना खा. अशोकराव चव्हाण यांनी तांत्रिक आकडेवारी सादर केली. ते म्हणाले की, ही मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात मिरज या दोन मोठ्या रेल्वे जंक्शनमधील अंतर 991 किमीवरून 807 किमीवर येईल. म्हणजेच सुमारे 184 किमीचे अंतर कमी होईल. याचा थेट फायदा विदर्भ आणि शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेशातील बिलासपूर व जबलपूर सारख्या शहरांना पश्चिम किनारपट्टीकडे जाण्यासाठी होईल.
महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या खर्चात आपला 50 टक्के वाटा उचलण्याचे आधीच मान्य केले आहे. या प्रकल्पाचा फायनल लोकेशन सर्व्हे देखील पूर्ण झाला असून प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. केंद्र सरकारने याला तातडीने मंजुरी दिल्यास राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असे ते पुढे म्हणाले.