

किनवट : गतवर्षी केवळ एक रुपया हप्ता असल्याने पंतप्रधान पीकविमा योजनेला मोठा प्रतिसाद देणाऱ्या किनवट तालुक्यात यंदा रब्बी हंगामात मात्र चित्र पूर्णतः बदलले आहे. बदललेले निकष, पीकनिहाय वाढलेले हप्ते आणि नुकसानभरपाईच्या पद्धतीतील फेरबदल यामुळे यंदा केवळ 801 शेतकऱ्यांनीच 1 हजार 096.79 हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी विमा घेतला आहे. शेतीवर वाढत्या हवामान अनिश्चिततेचे सावट असताना विमा संरक्षणाकडे झालेली ही घट चिंताजनक मानली जात आहे.
मागील वर्षी तालुक्यात 8 हजार 063 शेतकऱ्यांनी तब्बल 13 हजार 206 अर्ज सादर करून पीकविमा घेतला होता. यंदा मात्र केवळ 1 हजार 298 अर्ज दाखल झाले असून, त्यापोटी 4 लाख 16 हजार 631 रुपयांचा विमा हप्ता भरला गेला आहे. गतवर्षाशी तुलनात्मक पाहता सुमारे 7 हजार 262 शेतकऱ्यांनी यावर्षी विम्याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते.
यंदा पावसाचा कालावधी लांबल्यामुळे रब्बी पेरण्यांना उशीर झाला. त्यातच एक रुपया हप्ता योजना बंद करून पीकनिहाय स्वतंत्र हप्ते निश्चित करण्यात आले. नुकसानभरपाईची रक्कम पीक कापणी प्रयोगांवर आधारित निश्चित होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा घेण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. शिवाय शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आल्याने काहींना प्रक्रियात्मक अडचणींनाही सामोरे जावे लागले.
रब्बी हंगामात किनवट तालुक्याचे सरासरी क्षेत्र 24 हजार 330.80 हेक्टर असताना यंदा 32 हजार 322.40 हेक्टरवर म्हणजेच 132.85 टक्के पेरणी झाली आहे. हरभरा, गहू आणि ज्वारी हीच पिके नांदेड जिल्ह्यासाठी अधिसूचित असून, हरभरा व गव्हासाठी 15 डिसेंबर तर ज्वारीसाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत होती. अंतिम तारखेपर्यंत विमा घेऊन या तीन पिकांचे संरक्षण करणाऱ्यांची संख्या मर्यादितच राहिली.
यंदा प्रतिकूल हवामानामुळे पेरणी, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती किंवा काढणीनंतरचे नुकसान यांसारख्या काही अतिरिक्त संरक्षण बाबी लागू नसल्यानेही शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाल्याचे दिसते. सध्या रब्बी पिके बहरात असली तरी अनिश्चित हवामानाच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. मात्र बदललेल्या अटी-शर्तींमुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र यंदाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
मागच्या वर्षी आठ हजार यावेळेस केवळ 800
रब्बी हंगामाच्या पिकविम्यासाठी मागील वर्षी किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल आठ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यावेळी मात्र, शेतकऱ्यांना रब्बी पीकविमा भरण्यात फारसे रस दिसत नाही. त्यामुळे आतापर्यंत केवळ 800 शेतकऱ्यांनी रब्बीचा पीकविमा भरला आहे. विशेष म्हणजे अटींची पूर्तता करण्यातच शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याने किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीचा पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे.