छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 9 ऑगस्टच्या मोर्चाची विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. सदरील बैठकीस शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांना मोर्चावेळी पालन करावयाच्या सूचनांची माहिती दिली तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
क्रांती चौक इथून हा मोर्चा सकाळी ठीक ९ वाजता निघून विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होईल. प्रशासन व जनतेची गैरसोय होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्व विद्यार्थी घेतील अशी हमी विद्यार्थ्यांनी दिली. सदरील मोर्चा क्रांती चौक, शिल्लेखाना चौक, सावरकर चौक, निराला बाजार, महात्मा फुले चौक, बुढी लेन मार्गे आमखास मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय या मार्गाने निघणार आहे.
आरक्षण हे कुठलाही आयोग किंवा न्यायालयात अडकलेले नसून ते राजकीय इच्छाशक्तीत अडकलेले आहे असाच सूर सर्वांच्या मनोगतातून दिसून येत होता. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मराठा हा कुणबी म्हणून गणला जातो. आरक्षणाचे सर्व लाभ त्यांना मिळतात. मराठा व कुणबी एकच असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. गायकवाड आयोगाने समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण सिद्ध केलेले असून आरक्षण देण्याची कृती सरकारची असते परंतु सर्वच पक्षांनी आतापर्यंत मराठा समाजाला गृहीत धरून आरक्षण दिलेले नाही असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र जर दिले तर त्यांचा आरक्षणाचा प्रश्न हा तात्काळ मार्गी लागू शकतो व हाच आरक्षण मिळवण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. म्हणूनच मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीच्या वतीने येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणात देण्यात यावे, या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारने समाजाला वेड्यात न काढता तात्काळ आरक्षण द्यावे अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. या मोर्चात आरक्षणा अभावी सर्वाधिक नुकसान झालेला विद्यार्थी वर्ग केंद्रस्थानी राहील व बाकी सर्व समाज पालक म्हणून पाठीशी राहील.
.हेही वाचा