

उमरगा, लातूर : शंकर बिराजदार
शहराचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने या पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्ष होण्यासाठी दिग्गज राजकीय नेत्यांच्या वारसदारातचढाओढ पहायला मिळत आहे. तर नगरसेवकपद मिळावे म्हणून दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेत्यापुढे प्रेझेंटेशन करीत आहेत. त्यामुळे यावेळच्या निवडणूकीत युवा इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सर्वच पक्षातील नेते मंडळींना त्यांना सावरणे किंबहुना त्यांची समजूत घालणं कठीण होऊ लागले आहे. यामुळे प्रमुख पक्षांच्या नेते मंडळी पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
उमरगा-लोहारा भागाच्या राजकीय पटलावर नेहमीच संघर्ष, विचार आणि नेतृत्व यांचा संगम दिसून आला आहे. याच परंपरेला साजेशी अशी चुरशीची लढत यंदा नगर परीषद `साठी होण्याची चिन्हे दिसत असली तरी गेल्या काही वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, त्यात उमरगा नगरपालिका नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण झाल्याने या पदासाठी प्रस्थापित राजकीय वारसदार तरुण नेत्यांची संख्या वाढली आहे. थेट नगराध्यक्ष होण्यासाठी मोठी चढाओढ पहायला मिळत आहे.
सध्या कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्या भाजपा प्रवेशामुळे महायुतीचे विशेषतः भाजपाचे पारडं जड दिसत असलं तरी नगराध्यक्ष पदावरुन काडीमोड घेतला जावू शकतो. काँग्रेस मधून भाजपातील पक्षांतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मारक ठरले आहे. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात उमरगा शहराने प्रभावी भूमिका बजावली आहे. महाविकास आघाडी एकसंध ठेवून नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारावर एकमत झाल्याची चर्चा आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसारख्या मुद्यांवर सातत्याने सामाजिक कार्यकर्ते समाजातील विविध घटकांसाठी, विविध प्रसंगी नागरिकांच्या मदतीस धावून जातात. या सामाजिक कार्यकर्त्यांचाही नागरिकांचा विशेष गट आहेत. त्यामुळे नागरिकांचा कल सामाजिक कार्यकर्त्यांकडे आहे. गेल्या टर्ममध्ये नगरसेवकांच्या कामकाजा बाबतची नाराजी, विकास कामांचा झालेला बट्याबोळ यामुळे विकासासाठी झटणारा नगरसेवक असावा, त्याकरीता सामाजिक कार्यकत्यांनी निवडणूक लढावी अशी अपेक्षा आणि मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यां मधील संघटनात्मक बळ लक्षात घेता लढत पारंपरिक वाटत असली तरी तिसरी आघाडी उभी राहिल्यास समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. राजकीय समीकरणे आणि स्थानिक विकासाच्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिक रोचक होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नेते सावध भूमिकेत !
प्रभागांमध्ये पडलेल्या आरक्षणानुसार त्या त्या ्रभागातील इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. पक्षाकडून तिकिट न मिळालेले इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने यांना रोखणे हे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील विशेषतः भाजपाचे नेते सावध भूमिकेत आहेत. कोणालाही अधिकृत शब्द दिलेला नाही, अशी भूमिका बहुतांश पक्ष नेत्यांनी घेतली आहे. तर अनेकांनी आपल्या प्रभागात मशागत सुरू केली आहे. घरोघरी भेटी देऊन जनतेशी संवाद आणि आश्वासने देण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, लोकांमध्ये निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. या वेळी कोण उमेदवार?, कुणाला संधी मिळणार ? कोणते पक्ष एकत्र येणार? असे प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.