उमरगा : किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून झोपलेल्या एकाच्या उजव्या कानाजवळ हत्याराने जोरात वार करून खून केला. ही घटना तुरोरी (ता. उमरगा) शिवारात मंगळवारी (दि. ०७) सकाळी साडे सातच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एका विरोधात उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यत आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील तुरोरी येथील बालाजी सहदेव जाधव यांच्या शेतात विश्वंभर दौलप्पा दापेगावे (वय ३५, रा. थोरलेवाडी) व जगन्नाथ दामोदर सूर्यवंशी (रा. कोळसूर कल्याणी, ता. उमरगा) हे दोघे सालगडी म्हणून कामाला होते. सोमवारी रात्री दोघात भांडण झाले. याचा राग मनात धरून शेतातील घरी कोणी नसल्याने पाहून लोखंडी दिवानवर झोपेत असताना विश्वंभर यांच्या उजव्या कानाजवळ हत्याराने जोरात वार केला. यात गंभीर जखमी विश्वंभरचा मृत्यू झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेत मालक बालाजी जाधव हे दूध आणण्यासाठी शेतात गेले. विश्वंभर हा कोट्यातील दिवानवर मयत होऊन पडल्याचे दिसले. तर दुसरा सालगडी जगन्नाथ हा शेतात नव्हता, परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपाजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ सायबान्ना महादेव दापेगावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ सूर्यवंशी याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी हे करीत आहेत.