

Two gates of Rena Dam opened; third time to release water
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणा मध्यम प्रकल्पात येवा सुरू असल्याने सोमवारी धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडून रेणा नदीपात्रात ६२९. २२ क्युसेक (१७. ८२ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यापूर्वी २८ ऑगस्टपासून धरणाचे सहा दरवाजे २० सें.मी.ने उघडून तब्बल ५० तास रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पाणी सोडण्याची ही तिसरी वेळ आहे.
पन्नास तासांत एकूण १७ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर परत १ सप्टेंबर २०२५ ला दुसऱ्यांदा धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले होते. यामुळे रेणा नदी काढच्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने त्यांच्या सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही पिके आजही पाण्याखालीच आहेत.
परत पाणी सोडल्याने उरलेली पिकेही वाया जाणार आहेत शासनाने तातडीने बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी दिलीप पाटील यांनी केली आहे. २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत रेणा नदी पात्रात ३७५५. २१ क्युमेक्स म्हणजेच १०६. ३५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीकाठच्या दोन्ही बाजूंच्या चार ते पाच हजार फुटांपर्यंतच्या शेतामध्ये पाणी घुसले होते. त्यात शेकडो शेतकऱ्यांना त्याचा जबर फटका बसला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच पिके पाण्याखाली आली आहेत.
ओढ्याच्या पाण्यामुळे अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. नदीचे पाणी शेतात घुसल्यामुळे नदीकठचे शेतकरी दिलीप पाटील, गोविंद पाटील, रेवती पाटील, राम पाटील, काशिनाथ पाटील, मतीन अली सय्यद, अमर पाटील, नंदकुमार आकनगीरे, नरहरी डावळे, संजीवनी पाटील, मथुराबाई नांदगावकर, केशव पाटील, चंदन पनुरे, नितीन गाडे, बाळू पाटील, हरीवा गाडे, हंबीरे, मामडगे, राहुल सुखसे, नितीन मोटेगावकर, भिकाने, राजकुमार मोटेगावकर, कापसे, लोखंडे आदींच्या शेतातील कडवा, सोयाबीनचे गुळी, शेती औजारे व इतर सर्व साहित्य वाहून गेले आहे.
नदी काढच्या व बाधीत सर्व शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे. दोन दिवसांनंतर धरण क्षेत्रात पाण्याचा येवा सुरू झाल्यामुळे परत तिसऱ्यांदा सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) रोजी धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघाडण्यात आले आहेत. सध्या रेणा नदीपात्रात ६२९.२२ क्युसेक १७.८२ क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.