

There is a need to effectively implement the Jaltara scheme in Renapur Taluka
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुका नेहमीच पाणी टंचाईच्या छायेत राहिला आहे. या वर्षी तीव्र उन्हामुळे तापमानात वाढ झाल्याने यंदाच्या पावसाळ्यावर "एल निनो "चे सावट येण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी काळात येणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेणापूर तालुक्यात " जलतारा " योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.
तालुक्यात कडक उन्हामुळे पाण्याची भुजल पातळी खालावली आहे. विहिरी - बोअरनी तळ गाठला होता 7 तर रेणा व्हटी या प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट होत आहे. पाझर तलाव कोरडे पडत आहेत, धरणातून बॅरेजेस मध्ये सोडलेल्या पाण्याचा वापर शेतीसाठी होत आहे. परिणामी तांडे वाड्यातील सर्वसामान्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.
अशा परिस्थितीत " जलतारा "योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. यामुळे भुजल पातळी वाढून शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी गावागावात व प्रत्येक शेतकऱ्यांने भूजल पुनर्भरण केले तर येण्याऱ्या संकटावर मात करता येईल. रेणापूर तालुक्यात आजही तांड्या वाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही. हनमंतवाडी तांड्यावरील नागरीकांना उन्हाळा असो की पावसाळा नेहमीच पिण्याचे व सांडपाणी विकतच घ्यावे लागते. दरवर्षी तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार एल निनो च्या पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे सांगीतले जात आहे. पाऊस कमी झाल्यास केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील अतिशोषीत गावात जुन ते ऑक्टोबर या कालावधीतील पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्याचे काम भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातुन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
लहान लहान ओढे, नाले, पाणी साठून राहणारी ठिकाणांचे प्राधान्याने पुनर्भरण करावे लागणार आहे. शेतकरी व सर्वसामान्यांना आर्थिक भार सोसावा लागू नये म्हणून रोहियो च्या माध्यमातुन अनुदान देणे गरजेचे आहे.