

Ten thousand crore rupees for various works have not been paid by the government, the contractor is in trouble
लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर जिल्ह्यातील विविध ठेकेदारांचे शासनाच्या विविध विभागाकडे सुमारे दहा हजार कोटी रूपयांची बिले थकली असून ठेकेदार परेशान झाले आहेत. थकीत बिले न मिळाल्यास ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या ठेकेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद विभाग, पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन, रोहयो, महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद अशा विविध विभागांची अनेक कामे कंत्राटदारानी पूर्ण केलेली आहेत व बरीच कामे प्रगतीपथावर आहेत.
परंतु गेल्या दोन वर्षापासून कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके प्रलंबित आहेत. यामुळे बँकांचे व्याज, हप्ते, मजुरांचे पेमेंट, तसेच बाजारातील उसनवारीवर केलेले व्यवहार पूर्ण होत नसल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले असून त्याच्यात नैराश्य येत आहे. थकीत संपूर्ण देयके ८ ऑगस्ट पर्यंत अदा करावीत अन्यथा क्रांतीदिनी ९ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमदुत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ९ ऑगस्ट रोजी एक ठेकेदार बेमुदत उपोषण आहे.
सुरू करेल व इतर पाठिंबा म्हणून उपोषण करतील. १५ ऑगस्टपर्यंत देयके न मिळाल्यास त्या दिवसापासून सर्वच ठेकेदार बेमुदत उपोषणास बसतील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील महिन्यात सांगली येथील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी प्रलंबित देयके न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातसुद्धा कंत्राटदार आर्थिक अडचणीत आहेत त्यांच्यातही नैराश्य वाढले आहे यामुळे सांगली येथील दुर्घटनेची पुनरावृती लातूर जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने ८ ऑगस्टपर्यंत थकीत रक्कम कंत्राटदारांना द्यावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.