

विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुका हा नेहमीच टंचाईच्या छायेत राहिला आहे. सध्या तीव्र उन्हामुळे तापमानात वाढ होऊन विहिरी व बोअरचे पाणी कमी होत असून रेणा व व्हटी या प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट होत आहे.
रेणा नदी काढच्या शेतीला पाणी पुरवठा व्हावा म्हणून 12 मार्चला नदीवरील बॅरेजेसमध्ये 1.5 दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याचा जवळपास अडीचशे हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे. सध्या रेणा प्रकल्पात 53. 41 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अशी माहिती शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.
कडक उन्हामुळे तालुक्याच्या भूजल पातळीमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. या वर्षी तालुक्यात अधिक पाऊस झाल्यामुळे रेणापूर तालुक्याची भूजल पातळी वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा होती. केवळ पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रेणापूर तालुक्यात गेल्या कांही वर्षातील पर्ज्यन्यमानाची स्थिती लक्षात घेता दरवर्षी तालुक्यातील जनतेला नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असे.
मे 2024 मध्ये भुजल विभागाच्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार रेणापूर तालुक्यातील 10 गावे अतिशोषित म्हणून घोषित करण्यात आली होती. तीव्र उन्हामुळे तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता. तालुक्यातील लहान मोठे तलाव, बॅरेजेस, शेततळ्यातील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे.
त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी सध्याची स्थिती आहे. तीव्र उन्हामुळे तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता.या वर्षी पावसाने तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प, व्हटी प्रकल्प व लघु प्रकल्पातील जल साठ्यात अपेक्षित वाढ झाली होती. मात्र कडक उन्हामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
यावर्षी उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असून रेणा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी इतरही काही उन्हाळी पिके घेतलेली आहेत. रेणा धरणातून नदीवरील बॅरेजेसमध्ये पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार 12 मार्चला 10 सें.मी.ने दोन दरवाजे उघडून नदीपात्रात 1.5 दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे घनसरगाव, रेणापूर, जवळगा व खरोळा या बॅरेजेसमध्ये सध्या मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा नदीकाठच्या दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील ऊसासह इतर पिकांना त्याचा फायदा होतो आहे. अनेक शेतकरी या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करीत आहेत.
31 मार्चअखेर रेणा प्रकल्पात 10 .98 दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठा 1 . 129 दलघमी इतका असून एकूण पाणीसाठा 12. 109 दलघमी आहे पाण्याची एकूण टक्केवारी 53 . 41 अशी आहे हे पाणी पानगाव बारा खेडी, रेणापूर दहा खेडी , पट्टीवडगाव पाच खेडी, खरोळा या नळयोजनेसाठी पुरेल असे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.