

Normal life disrupted due to heavy rain in Jalkot taluka
जळकोट, पुढारी वृत्तसेवा : जळकोट तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तिरुका, मरसांगवी, बेळसांगवी या भागांतील तिरु नदीने रौद्ररूप धारण केले असून नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. बेळसांगवी येथे शेतातील पाईपलाईन आणि विद्युत मोटारी वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांमध्ये किती सोसायचे? शेती कशी करायची? कसे जगायचे?, अशी हताशा पसरली आहे.
चारही बाजूंनी तालुक्याचा संपर्क तुटल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. जिरगा ढोरसांगवी-धामणगाव, माळहिप्परगा पाटोदा खुर्द, शेलदरा-वडगाव-होकर्णा-केकतसिंदगी, जळकोट-सोनवळा-बेळसांगवी वाढवणा बु आदी मार्गावरील वाहतूक पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे बंद करण्यात आली आहे. करंजी येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेजारील शेतीस प्रचंड नुकसान झाले आहे. आज सकाळी जळकोट मंडळात ८५ मिमी तर घोणसी मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि बचावात्मक खबरदारी घ्यावी, असे तहसीलदार राजेश लांडगे यांनी सांगितले. बेळसांगवी येथे ड्रोन पाहणीची मागणी !
बेळसांगवी गावाला तिरु नदीच्या पुराचा भयंकर असा वेढा पडला असून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावाची वाहतूक बंद आहे. शिवारातील अनेक शेतकऱ्यांची पाईपलाईन व विद्युत मोटारी वाहून गेल्याचे शेतकऱ्यांने सांगितले. तिरु नदीच्या पाण्याचा गावाला पडलेला वेढा व धोका लक्षात घेऊन बेळसांगवी येथे ड्रोन कॅमेराद्वारे पाहणी करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून उदगीरचे उप विभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी त्यास होकार भरला आहे.
तालुक्यातील पूर परिस्थिती, विविध ठिकाणी ठप्प असलेली वाहतूक यासंदर्भात तहसीलदार राजेश लांडगे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळकोटच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता शीतल व्हट्टे, शाखा अभियंता पवन कांबळे, ग्राम महसूल अधिकारी कुंदन लोखंडे, प्रमोद सूर्यवंशी, परिसर अभियांत्रिकी सहाय्यक गणेश सताळे, ग्राम पंचायत अधिकारी व्ही व्ही साबळे, केशव शेवटे, श्यामसुंदर पाटील, सरपंच जयश्री मुसळे, गजानन मुसळे यांनी माहिती दिली. आमदार संजय बनसोडे यांनीही जनता घाबरु नये, परिस्थितीला धैयनि सामोरे जावे आणि शासनाकडून लागणारी मदत मिळेल, असे आवाहन केले आहे.