

Nilanga Congress Protest Warning
निलंगा : मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने निलंगा तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली आहेत. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उमरगा (हा.) परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना अभय साळुंके यांनी सांगितले की, पावसाळा संपत आला असतानाही जिल्ह्यात सोयाबीन, मोसंबी, केळी, ऊस, ज्वारी यांसह विविध पिकांवर पावसाअभावी परिणाम झाला आहे. तलाव व छोटे जलसाठे कोरडे पडत आहेत, तर विहिरींच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पशुधनासाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करावी. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. पावसाचा दीर्घ खंड लक्षात घेऊन पीकविमा योजनेच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करून शेतकऱ्यांना विम्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी साळुंके यांनी केली.
तसेच संकटग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी रेशनची व्यवस्था, पशुधनासाठी चारा छावण्या आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. पाहणीनंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी प्रमोद मरुरे, पंचायत समिती सदस्य किरण पाटील, श्रीमंत जाधव, अभिजित उसनाळे, नगरसेवक अजित नाईकवाडे, सिराज देशमुख, प्रशांत वांजरवाडे, गणेश पेठकर, आंबादास जाधव, विठ्ठल पाटील, गंगाधर चव्हाण, किशोर कारखाने, माधवराव पाटील, विकास पाटील, चक्रधर शेळके, बालाजी गोमसाळे, प्रा. रमेश मदरसे, अमोल बिराजदार, माधव वाडीकर, महेश तिवारी, गौतम सोनकांबळे आदी उपस्थित होते.
आठ दिवसांत पॅकेज जाहीर करा
शेतकरी अडचणीत असताना सरकार गप्प आहे. दररोज शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. आणखी किती जीव गेल्यानंतर सरकार जागे होणार, असा सवाल अभय साळुंके यांनी केला. आठ दिवसांत शेतकरी हिताचे विशेष पॅकेज जाहीर करावे; अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असेही साळुंके यांनी स्पष्ट केले.