

Wadwal Nagnath station facilities Issues
संग्राम वाघमारे
चाकूर : तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून रेल्वे प्लॅटफॉर्मच्या कमी उंचीमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
वडवळ ना. जवळपास १६ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. या भागात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. टोमॅटोची मोठी बाजारपेठ असून रेल्वेने शेकडो प्रवासी ये-जा करतात.येथील रेल्वेस्थानक असून अडचण नसून खोळंबा बनले आहे. येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या स्थानकावर दररोज आठ ते दहा रेल्वे गाड्या थांबतात आणि शेकडो प्रवासी उतरतात. मात्र, स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने मोठी अडचण झाली आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी प्रवाशांना भटकंती करावी लागत असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी कोणताही निवारा (शेड) नसल्यामुळे कडक उन्हात आजूबाजूच्या झाडांचा आश्रय घ्यावा लागत आहे. भर उन्हात उभे राहून रेल्वे गाड्यांची वाट पाहावी लागत आहे.
या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची अत्यंत कमी असल्याने रेल्वेत चढ-उतार करताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेकदा अपघात होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.रेल्वे आणि प्लॉटफॉर्ममधील अंतर अधिकचे असल्यामुळे महिला व ज्येष्ठ प्रवाशांना या अंतरामुळे रेल्वेत चढ उतार करताना पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या सर्व समस्यांमुळे वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावरील प्रवासी हैराण झाले असून, रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबींची तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वडवळ ना. रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निवाऱ्याची उभारणी तसेच प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची कामे त्वरित करण्यात यावीत, अशी मागणी प्रवाशांनी व्यक्त केली आहे.