

चाकूर : संग्राम वाघमारे
Latur Chakur Road Traffic: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या दुतर्फाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन न केल्याने शहरातील बसस्थानक व प्रमुख मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक, व्यापारी तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रविवारी (दि. ९ ऑगस्ट) सकाळी चाकूर शहरातील बसस्थानक परिसरात रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे अरुंद रस्त्याचा वाहतुकीला चांगलाच फटका बसत असून वाहनांची अशी कोंडी झालेली पाहायला मिळाली.
चाकूर बायपास ते लातूर रोड रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरु झाले आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक गती अपेक्षित असताना प्रत्यक्षात काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साहित्य विखूरल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे.
त्यातच मोठी वाहने, एसटी बस, दुचाकी आणि चारचाकी वाहने वारंवार एकाच ठिकाणी अडकत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. कामाच्या ठिकाणी वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, या बाबीकडे संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदाराचे पुरेसे लक्ष नसल्याची चर्चा नागरिकांतून आहे.
रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता काम लवकर पूर्ण करणे आवश्यक असताना कामाची गती अत्यंत कमी असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
चाकूर शहरातील रस्त्याच्या कामावर संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने नियमित देखरेख करून कंत्राटदाराला कामाची गती वाढविण्याच्या सूचना देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
रस्त्याचे काम संथगतीने होण्यास संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदार जबाबदार असून तातडीने कामाला गती द्यावी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी केली आहे.