

निलंगा :रेल्वेच्या नकाशावरून निलंगा मतदार संघ आऊट ! झाल्याने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटलांचे 'रेल्वेचे स्वप्न' हवेतच विरले आहे का? माजी मंत्र्यांचा सत्कार न स्वीकारण्याचा 'पण' फोल ठरला आहे. उमरगा औसा मार्गाने कलबुर्गी-लातूर रेल्वे आता धावणार आहे.
यामुळे निलंगा मतदारसंघाचे रेल्वेचे दिवा स्वप्नच राहणार आहे? हायवे आला, आता रेल्वे आणल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही, असा घणघाती शब्द निलंग्याच्या मतदारांना देणारे माजी मंत्री आणि स्थानिक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे 'रेल्वेचे स्वप्न' अखेर दिवास्वप्नच ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत रेल्वेच्याच मुद्यावर मते पदरात पाडून घेतल्यानंतर, प्रत्यक्षात समोर आलेल्या रेल्वेच्या अधिकृत आराखड्यातून निलंगा मतदारसंघ पूर्णपणे वगळला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कलबुर्गी ते लातूर दरम्यानच्या १५७.८२ किलोमीटरच्या नवीन ब्रॉडगेज विद्युतीकृत रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) भारतीय रेल्वेने तयार केला असून, हा मार्ग निलंग्याऐवजी उमरगा (जि. धाराशिव) आणि औसा (जि. लातूर) या जवळच्या तालुक्यांमधून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दहा वर्षांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या निलंगेकरांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशाच आली आहे.
४,९१७ कोटींचा प्रकल्प; पण राज्य सरकारच्या ५० टक्के हिश्रश्रयाची अट मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) भुवनेश कुमार गुप्ता यांच्या पत्रानुसार, या १५७.८२ कि.मी. लांबीच्या प्रकल्पाची अंदाजित किंमत ४,९१७कोटी इतकी आहे. सद्यस्थितीत कलबुर्गी ते लातूर हे अंतर रेल्वेने तब्बल ३४५ कि.मी.चे आहे. या नवीन प्रकल्पामुळे महाराष्ट्रातून ९६.८२ कि.मी.चा मार्ग जाणार असून हे अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे व्यापार, उद्योग, विद्यार्थी आणि भाविकांना मोठा फायदा होणार असला, तरी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या या प्रकल्पाचा आर्थिक परतावा (आयआरआर) १० टक्के मिळत नसल्याचे अहवालात नमूद आहे.
यामुळे भारतीय रेल्वेने महाराष्ट्र शासनाकडे ५० टक्के खर्चाचा हिस्सा आणि मोफत जमिनीची मागणी केली आहे. राज्य सरकारने ही अट मान्य केल्यानंतरच या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळणार आहे.'त्या' घोषणांचे काय झाले? गेल्या १० वर्षांत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंग्यात रेल्वे आणण्याचे अश्वासन देऊन राजकारण तापवले. मात्र, प्रत्यक्ष सर्वे क्षणात तांत्रिक आणि भौगोलिकदृष्ट्या उमरगा औसा मार्ग सोयीचा ठरल्याने निलंग्याचा मार्ग आपोआप बंद झाला आहे. त्यामुळे रेल्वे धावणार या केवळ घोषणा ठरल्या असून, लोकप्रतिनिधींच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
आता रेल्वे तर निलंग्यात येत नाहीच, पण ज्या 'सत्कार न स्वीकारण्याच्या' शपथा आमदारांनी घेतल्या होत्या, त्याचे काय? असा खरमरीत सवाल आता निलंग्यातील सामान्य जनता आणि मतदार विचारत आहेत. असा जाणार होता रेल्वे मार्ग लातूर जिल्ह्यातील अहमदपूर (माणिक दंड) शिरूर अनंतपाळ देवणी निलंगा मार्गे कलबुर्गी असा रेल्वे मार्ग जाणार होता. परंतु तो आता रेल्वेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणात बदलण्यात आल्याचे पत्र रेल्वे अधिकान्याने काढल्याने निलंगा मतदार संघातील जनतेची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.
निलंगा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्याकडून रेल्वे ही निलंगा मतदार संघातूनच जाणार अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली जात आहे तर औसा मतदार संघातील कार्यकर्त्याकडून रेल्वे ही निलंगा वगळून औसा मतदार संघातून जाणार असल्याचे रेल्वेचे अधिकृत पत्र फिरवले जात आहे त्यामुळे रेल्वे नेमकी कोणत्या मार्गावरून धावणार याबाबत मतदार संघातील जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे.
मागील काळात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका जाहीर कार्यक्रमांमध्ये रेल्वे ही औसा मतदार संघातूनच जाणार अशी हमी पूर्ण ताकतीने दिली होती. व तसे १६ एप्रिल २०२६ रेल्वे विभागाचे अधिकृत पत्र सोशल मीडियावर फिरत असल्याने रेल्वे मार्ग औसा मतदारसंघातूनच जाणार असे यावरून दिसत आहे.