

Mother and Children ends life Latur
औसा : तालुक्यातील खरोसा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका विवाहितेने कौटुंबिक कारणातून आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
निकिता अमरदीप भूरे (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिची मुलगी शिवानी आणि मुलगा शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना त्यांच्या घराशेजारील विहिरीत घडल्याचे समजते.
पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला गेला आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना औसा तालुक्यातील खरोसा येथे घडली. रविवारी (दि.१९) संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता भुरे या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या.
सकाळी त्या तिघांचा शोध घेण्यात आला, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या दुर्दैवी घटनेमुळे खरोसा गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पती - पत्नीच्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण खरोसा परिसर शोकमग्न झाला आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.