

जालना : जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. सुमारे 10 हजार 68 हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. तर सध्या महारेशीम जनजागृती अभियान सुरू सुमारे 852 शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रेशीम उद्योग विकास योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांसाठी हा उद्योग उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरत आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारा, पर्यावरणपूरक आणि हवामान बदलास तग धरणारा उद्योग म्हणून रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सध्या जालना जिल्ह्यात 1048 शेतकऱ्यांकडे 1068 एकर क्षेत्रावर तुती लागवड करण्यात आली असून तुती लागवड व अंडीपुंज वाटपामध्ये जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक आहे. घनसावंगी, अंबड, परतूर आणि जालना या तालुक्यांमध्ये सर्वाधिक तुती लागवड आढळून येत आहे.
सन 2024-25 मध्ये जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 500 अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले असून त्यातून 253 मेट्रिक टन रेशीम कोषांचे उत्पादन झाले. चालू वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत 3 लाख 5 हजार अंडीपुंजांचे वाटप होऊन 152 मेट्रिक टन उत्पादन घेतले गेले आहे.
रेशीम कोषांना सध्या प्रति क्विंटल सुमारे 60 हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात या उद्योगाकडे वळत आहेत. पारंपरिक कापूस पिकाच्या तुलनेत 2 ते 3 पट अधिक उत्पन्न मिळत असल्याने हा उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. तुती बाग एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्षे टिकते. हा उद्योग कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी मुक्त असल्याने पर्यावरणासही पूरक आहे.
आतापर्यंत 852 शेतकऱ्यांची नोंदणी - जिल्ह्यात जनजागृती मोहीम 4 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोक्रा-2 योजनेंतर्गत 800 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून रेशीम विभागाकडेही 52 शेतकरी सहभागी झाले आहेत.
अजय मोहिते, जिल्हा रेशीम अधिकारी, जालना.