.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लातूर: गणेशोत्सवात कधी काळी बलुतेदारांचा मान असलेले व अवघ्या पानसुपारीवर घरोघरी समाधानाने पुरविण्यात येणारे गौरीचे मुखवटे आता इतिहासजमा झाले आहेत. गावगाड्याचे वैभव असलेली ही कला आता आधुनिक रूपात आमदनीची धनी झाली आहे. (Ganeshotsav 2024)
गौरीच्या मुखवट्यांचा व त्यांच्या प्रतिष्ठापनेचा प्रवास मोठा रंजक आहे. पूर्वी गावगाड्यात बारा बलुतेदारांना मानाचे स्थान होते. कुंभार गौरी गणपतीचे मुखवटे गावकऱ्यांना पुरवत. या बदल्यात त्यांना मानाची सुपारी अन् गूळ खोबरे मिळत असे. वर्षाकाठी मिळणाऱ्या बलुत्यांत बलुतेदारांचा प्रपंच भागायचा म्हणून अगदी पानसुपारीवर गौरी-गणपती देण्यात त्यांना मनापासून समाधान वाटायचे. गाईच्या शेणाचा गोल उंडा करून त्याला आकार देऊन त्यातून गौरीचा मुखवटा साकारला जाई व मजबुतीसाठी त्याला उन्हात चांगले वाळवले जात असे. पुढे भाजलेल्या मडक्यावर हळदी-कुंकवाच्या साहाय्याने नाकतोंड काढलेले मुखवटे आले. (Ganeshotsav 2024)
या मुखवट्याच्या निर्मितीमागे सौंदर्या पेक्षा भक्तिभाव अधिक होता. त्यामुळे ते फारसे आखीवरेखीव नसले तरी त्यांची मनोभावे प्रतिष्ठापना होत असे. कालांतराने मुखवट्यातला हा ओबडधोबडपणा जाणवला. व सुरेख मूर्ती साकारण्याकडे बलुतेदारांनी लक्ष पुरवले. कुंभाराने मडकी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिखलातून गौरीचा चेहरा साकारला. त्याला आव्यात भाजले जाई. व पिवळ्या रंगाने तो रंगवला जाई. त्यावर नाक, डोळे, कान काढले जात असत. हीच आजच्या कॉर्पोरेट लूक असलेल्या गौरी मुखवट्याची पहिली प्रतिकृती होती. (Ganeshotsav 2024)
पितळेचे मुखवटेही सोनारांनी साकारले. पुढे शाडूचे आखीवरेखीव मुखवटे आले. चेहरा, डोळे, नाक, केशरचना अधिक देखणी झाली. वेगवेगळ्या रंगांचा वापर होऊ लागला. दरम्यान विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीने बलुतेदारीला घरघर लागली. बलुतेदारांच्या या कलेचा धागा पकडून अनेक मूर्तीकार तयार झाले. त्यांच्या मुखवट्याला व्यवसायाचे अधिष्ठान मिळाले. १९६४ नंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे आले व लक्ष्मीला कॉर्पोरेट लूक मिळाला.
पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या नळ्यावर पूर्वी गौरी उभी केली जात असे. त्यासाठी नळे जमिनीत ठोकले जायचे. त्यावर साड्या गुंडाळल्या जात व अग्रभागी मुखवटा बसवला जाई. हे करण्यासाठी किमान पाच तास लागत असत. त्यानंतर धान्याने भरलेल्या मडक्यांची उतरंड उभारुन त्यावर मुखवटे बसवले जाऊ लागले. उतरंडीच्या तळाशी चिकन मातीचे अळे असायचे. याच काळात प्रतिष्ठितांच्या घरी भांड्यांच्या उतरंडीचाही वापर होऊ लागला. पूर्वजांच्या पद्धतीमागे अनुभवातून आलेले शहाणपण व शास्त्र होते. मडक्यातील धान्यामुळे उतरंड हलत नव्हती. परिणामी गौरी कोसळण्याची भीती नसायची . पुढे लोखंडी पट्ट्यांपासून तयार केलेल्या कोथळ्या आल्या. त्याची सुधारित आवृत्ती म्हणून मानवी शरीराच्या आकारातील पत्र्याचे साचे आले. आज तर सजलेल्या देखण्या रेडिमेड गौरीही उपलब्ध आहेत.