

Heavy rains wreak havoc in Marathwada, heavy rains continue in Latur district
लातूर : पुढारी वृत्तसेवा
लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, सोमवारी (दि.२१) सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५.६ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारपासून पाऊस बरसतच होता. सप्टेंबर महिन्यात आजतागात १८८.८ मिमी इतका झाला आहे. वार्षिक सरासरीच्या ११३.६% पाऊस आजवर झाला आहे.
या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जीवित व वित्तहानी झाली आहे. सांगवी (ता. निलंगा) येथे अनिता राठोड यांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. काटेजवळगा (ता. निलंगा) येथे पाण्यात वाहन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय, सोनवळा (ता. जळकोट) येथे एक बोकड आणि पोहरेगाव (ता. रेणापूर) येथे एक कालवड दगावली आहे. पानचिंचोली आणि चाकूर येथे दोन घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. पाण्यामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. उस्तुती टाकळी, बांगजी-कवळी, निलंगा-कासार शिरशी, औसा-भादा, किल्लारी राजेगाव, मानेजवळगा-शेळगी, कवठा-केज अशा प्रमुख मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील माजरा, निम्न तेरणा, रेणापूर, खरोळा, जवळगा, तावरजा हे धरण प्रकल्प १००% पेक्षा अधिक भरले असून, २७ साठवण तलावही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नियंत्रित पद्धतीने नदीपात्रात करण्यात येत आहे. हवामान विभागाने २२ आणि २७सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आपत्कालीन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धाराशिव-परंडा, पुढारी वृत्तसेवा काल झालेल्या मुसळधार पावसामुळे परंडा तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, अनेक रस्ते, पूल पाण्याखाली जाऊन परंडा शहराचे दळणवळणाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. तालुक्यातली सर्वच नद्यांना पूर आला असून, सीना कोळेगाव, निन्म खैरी, इनगोंदा साठवण तलाव, खासापुरी प्रकल्प, साकत मध्यम प्रकल्प, चांदणी धरण आदी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदणी व उल्का नदीच्या पुरात काही वस्त्यावर नागरिक अडकले असून, अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या वतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या नरसाळे बस्ती वरील अंदाजे सहा व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले आहे. हिवरे वस्तीवर अडकलेल्या नागरिकांचा हेलिकॅप्टरच्या सहाय्याने एनडीआरएफची शोध मोहीम सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ढगपिंपरी, वडनेर देवगाव (ता. परंडा) येथून पुरात अडकलेल्या जवळपास २६ जणांची एनडीआरएफच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या साह्याने सुटका केली.
धूम तालुक्यातील पिंपळगाव येथील विश्वनाथ दातखीळे यांच्या १७गायी शेडमध्ये बांधलेल्या अवस्थेत मृत्युमुखी पडल्या. १५ वासरे, १० गायी व २० शेळ्या वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
शेळगाव येथील स्वैरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने करमाळा मार्गावरील रहदारी बंद आहे. वाटेफळ येथील नळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आनाळ्याकडे जाणारी वाहतूक बंद, आवार पिंपरी येथील उल्का नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने कुडूवाडीकडे जाणारी वाहतूक बंद, तर बार्शीकडे जाणारा रस्ता सोनगिरीजवळ पाण्याखाली गेल्याने सदरील सर्व रस्त्यावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.